लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू होणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी नागरिकत्व दुऊस्ती कायद्याबाबत (सीएए) मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करून त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वषी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या दौऱ्यात त्यांनी ‘सीएए’ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असा दावा केला होता.
‘सीएए’ कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. सरकारचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे हाच असल्याचे अमित शाह म्हणाले. काँग्रेसने शेजारील देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते. देशाची फाळणी झाल्यानंतर तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले. त्यानंतर सर्वांना भारतात आश्रय घ्यायचा असताना तेव्हा ‘तुम्ही इथे या, तुम्हाला इथले नागरिकत्व दिले जाईल’ असे काँग्रेसने सांगितले होते याची आठवणही शाह यांनी करून दिली आहे.
विरोधकांकडून दिशाभूल
केंद्रीय गृहमंत्र्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. सीएएबद्दल मुस्लीम बांधवांची दिशाभूल करण्याबरोबरच त्यांना चिथावण्याचा प्रयत्नही केला जात आहे. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचे उद्दिष्ट 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लीम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे असे असल्याचेही स्पष्ट केले. डिसेंबर 2019 मध्ये संसदेने सीएए मंजूर केल्यानंतर आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये निदर्शने झाली होती.
ही निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचार
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना गृहमंत्री शाह यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ही निवडणूक इंडिया विरुद्ध एनडीए अशी राहणार नसून विकास विरुद्ध भ्रष्टाचार यांच्यात असल्याचे नमूद केले. ही निवडणूक भ्रष्ट प्रशासन विरुद्ध शून्य सहिष्णुता यांच्यातच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत आता कोणताही सस्पेन्स राहिलेला नाही. विरोधी पक्षात बसणाऱ्यांनाही पुन्हा दुसऱ्या बाजूला बसावे लागणार याची खात्री आहे. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे जी एक उत्तम भारत-विकसित भारत निर्माण करण्याच्या थीमवर आधारित असेल, असे ते पुढे म्हणाले.