शहर हद्दवाढीचे भूत कायमचे गाडून टाका
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गावांचा हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. गावांलगतच्या महापालिका हद्दीतील उपनगरांमधील प्राथमिक सेवा-सुविधा पाहिल्या तर येथे भौतिक सुविधांचा अक्षरशा बोजवार उडाला आहे. येथील वस्तुस्थिती पाहता ग्रामीण भागातील जनतेची हद्दीवाढीमध्ये येण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शहर हद्दवाढीचे भूत कायमचे गाडून टाका अशी मागणी सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीने आमदार अमल महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत बैठक झाली. बैठीकमध्ये पालकमंत्री आबिटकर यांनी राज्यातील महापालिका निवडणुकांची आचार संहिता लागण्यापुर्वी कोल्हापूर शहरालगतच्या सहा गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश करण्याबाबत मुंबई येथे बैठक घेवून निर्णय घेवू असे सांगितले आहे. पण हद्दवाढीबाबत 20 गावांनी पहिल्यापासूनच विरोधाची भुमिका घेतली आहे. पुढील काळातही या गावांची विरोधाची भुमिका कायम राहणार आहे. त्यामुळे गावांच्या विरोधाची भुमिका शासनापर्यंत पोहचवून हद्दवाढीचे भूत कायमचे गाडून टाकावे. तरीही हद्दवाढीचा निर्णय झाल्यास संबंधित गावे तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतेवेळी सचिन चौगले वडणगे, राखी भवड बालिंगे, सुमन गुरव कळंबा, अनिता खोत वाडीपीर, अमृता पोवार नागदेववाडी, सुनंदा पाटील आंबेवाडी, संदीप पाटोळे गांधीनगर, शुभांगी अडसुळ सरनोबतवाडी, अश्विनी शिरगावे गडमुडशिंगी, रुपाली कुसाळे वळीवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.