महिपाळगड डोंगरपायथ्याशी बॉम्बगोळे, कुत्री ओरडण्याचा आवाज
गव्यांच्या कळपांना हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी लढविली नामी शक्कल; पिकांचे मोठे नुकसान
वार्ताहर/उचगाव
बसुर्ते, कोनेवाडी, बेकिनकेरे गावातील शेतकऱ्यांची शेती वैजनाथ महिपाळगड या डोंगरपायथ्याशी असून गव्यांच्या कळपाचे कळप या शेतवडीत सातत्याने घुसून शेतातील पिकांचे प्रचंड नासधूस करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॉम्बगोळ्याचे आवाज, कुत्र्यांचा आवाज आणि नागरिकांकडून जोरजोराने ओरडण्याच्या आवाजाची ध्वनिफीत तयार करून रात्रभर हा आवाज शेतवडीमध्ये ठिकठिकाणी साऊंड स्पीकरद्वारे लावून गोंधळ घालण्याची शक्कल लढवली आहे. यामुळे काही प्रमाणात गव्यांच्या कळपांना सध्या आळा बसला आहे. मात्र वनखाते यावर तातडीने उपाय करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी या भागातील असंख्य शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
वैजनाथ डोंगर, महिपाळगड डोंगरभागात गव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातून रात्रीच्या वेळी बसुर्ते धरणातील पाणी पिण्यासाठी गव्यांचे कळपच्या कळप बसुर्ते, कोनेवाडी, बेकिनकेरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतवडीत उतरत असतात. शेतवडीत भाजीपाला, मका, मिरची, जोंधळा, बटाटे, भुईमूग अशी विविध पिके वर्षभर उन्हाळा, पावसाळा अशा वेगवेगळ्या ऋतूमध्ये घेतली जातात. शेतवडीतील या उभ्या पिकांमधून गव्यांचे कळप जाऊन शेतवडीतील पिकांचे मोठे नुकसान सातत्याने करत असतात. शेतात शेतकरी तळ ठोकून या जनावरांना हाकण्यासाठी थांबावे तरी हे प्रसंग जीवावर बेतणारेच आहे.
यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरतात. यासाठी सध्या शेतकऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली असून आवाजाच्या ध्वनीफीती तयार करून स्पीकरद्वारे शेतवडीत ठिकठिकाणी लावल्याने गव्यांचे कळप डोंगरातून खाली शेतवडीत येण्यासाठी धजत असल्याने यावरती थोडा आळा बसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मात्र हे किती दिवस असेच करत राहणार. कारण सदर ध्वनिफीत दिवसभर चार्जिंग करावे लागते. आणि रात्री रोज जाऊन ते लावावे लागतात.शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन कमी झाले असून जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने वनखात्याला आदेश देऊन या भागात गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान होत आहे.