हाथरस प्रकरणी आयोजकांवर ठपका
चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर, स्थानिक प्रशासनाकडून ढिसाळपणा, घातपाताचीही शक्यता
वृत्तसंस्था / हाथरस
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमात 2 जुलैला झालेल्या भीषण चेंगराचेंगरीच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. या दुर्घटनेला या कार्यक्रमांचे आयोजक कारणीभूत आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाकडूनही सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. घातपाताचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत 123 भाविकांचा मृत्यू झाला होता. ज्या स्थानी हा कार्यक्रम झाला त्या स्थानाची पाहणी न करताच कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने अनुमती दिली. स्थानिक प्रशासनाने 80 हजार भाविकांच्या उपस्थितीची अनुमती दिली होती. तथापि, कार्यक्रमाच्या आयोजकांनी अडीच लाख भाविकांना प्रवेश देऊन प्रशासनाने संख्येवर घातलेले बंधन धाब्यावर बसवले. तसेच गर्दीला आवरण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ही या दुर्घटनेची प्रमुख कारणे असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सहा सेवादारांनी केले होते.
व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष
प्रचंड संख्येने आलेल्या भाविकांना पुरेशा सोयी दिल्या गेल्या नाहीत. कमी जागेत अधिक लोक भरल्यामुळे चेंगराचेंगरीला प्रारंभ झाल्यानंतर भाविकांना लवकर बाहेर पडता आले नाही. परिणामी दुर्घटनेची तीव्रता वाढली. आयोजकांकडे गर्दीला आवरण्याची क्षमता नव्हती. तरी मोठ्या संख्येने लोकांना येऊ देण्यात आले. चेंगराचेंगरी होताना ती थांबविण्यासाठी आयोजकांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट अनेक आयोजकांनी तेथून पलायन केले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाची ढिलाई
स्थानिक प्रशासनाने या कार्यक्रमाला अनुमती देताना पुरेशी दक्षता बाळगली नाही. कार्यक्रमाच्या स्थानाची अधिकाऱ्यांनी पाहणी करावयास हवी होती. तसेच दुर्घटना घडू शकेल, अशी शक्यता गृहित धरुन पूर्वदक्षता घ्यावयास हवी होती. भाविकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आपत्कालीन साहाय्यतेसाठी सज्जता पुरेशी नव्हती. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची ढिलाई या दुर्घटनेला तितकीच कारणीभूत आहे, असेही स्पष्ट केले गेले आहे.
अहवालात कोणते निष्कर्ष...
- कार्यक्रमाच्या आयोजकांकडून अक्षम्य ढिसाळपणा झाला. गर्दीवर नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. बॅरिकेडस् आणि येण्याजाण्यासाठी मार्गांचा अभाव होता. आयोजकांनी महत्वाची माहिती स्थानिक प्रशासनापासून लपविली आणि या कार्यक्रमाला प्रशासनाची अनुमती मिळविल्याचे स्पष्ट होत आहे.
- या दुर्घटनेमागे मोठे घातपाताचे कारस्थान असू शकते. तपास दलाने ही शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे सखोल तपास होणे आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्यामुळे घातपात घडविला असणे शक्य आहे. तपास दलाकडून ही शक्यता गृहित धरुन तपास केला जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- स्थानिक प्रशासनही या दुर्घटनेला तितक्याच प्रमाणात उत्तरदायी आहे. जिल्ह्याचे एसडीएम, मंडल अधिकारी, तहशीलदार, पोलिस निरीक्षक, आऊटपोस्ट अधिकारी यांनी हा कार्यक्रम गंभीपणे घेतला नाही. या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने केले नाही. त्यांच्या ढिलाईमुळे दुर्घटना घडली आहे.
- एसडीएमने स्थानाची पाहणी न करताच कार्यक्रमाला अनुमती दिली. त्याने आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधी माहितीही दिली नाही. तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांकडून पोलिसांच्या कामात अडथळे आणण्यात आले. स्थानाची पाहणी पोलिसांना करु दिली गेली नाही.
- कार्यक्रमाचे मुख्य साकार हरी तथा भोले बाबा यांना कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय भक्तांना भेटू देण्यात आले. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे एकाच वेळी अनेक भाविकांची त्यांचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले.