भाजपचा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच !
पंतप्रधान मोदी यांचे पक्षाच्या संसदीय दल बैठकीत प्रतिपादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचेच फळ आहे. या यशाचे सारे श्रेय त्यांचेच आहे, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पक्षाच्या संसदीय दल बैठकीत काढले आहेत. ही बैठक गुरुवारी संसद भवन परिसरात पार पडली. या बैठकीत त्यांनी भाषण केले. या बैठकीला भाजपचे सर्व खासदार आणि संसदीय नेते उपस्थित होते. संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यांनीच बैठक समाप्त झाल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विजय कार्यकर्त्यांनाच समर्पित केला. तीन राज्यांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. तसेच तेलंगणातही भाजपची स्थिती अधिक बळकट झाली. कार्यकर्त्यांनी हे मोठे आव्हान स्वीकारल्याने भाजपला बळ मिळाले, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
वादळावरही चर्चा
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये ‘मिचौंग’ या वादळामुळे झालेल्या हानीची चर्चाही बैठकीत करण्यात आली. मात्र, भारतीय जनता पक्ष विजयी झालेल्या तीन राज्यांमधील नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवरही चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. पण अशी कोणतीही माहिती बैठकीनंतर देण्यात आलेली नाही.
‘जी’ असे संबोधू नका !
‘मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या आडनावापुढे ‘जी’ जोडून मला संबोधू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना केली, अशी माहितीही प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बैठकीत त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
लाभार्थींसह ‘सेल्फी’ घ्या !
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता कंबर कसून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले पाहिजे. केंद्र सरकारच्या योजनांचे देशभरात जे लाभार्थी आहेत, त्यांच्याशी कार्यकर्त्यांनी नित्य संपर्क करावा. तसेच त्यांच्यासह सेल्फी घ्यावी आणि सोशल मिडियावर प्रसिद्ध करावी, अशी महत्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांना केली आहे. या अभियानाचे उत्तरदायित्व ज्या नेत्यांवर सोपविण्यात आले आहे. त्यांच्यात पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचाही समावेश आहे.
घवघवीत यश
भारतीय जनता पक्षाला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान (200 पैकी 115 जागा), मध्यप्रदेश (230 पैकी 163 जागा) आणि छत्तीसगड (90 पैकी 54 जागा) असे मोठे यश मिळाले. राजस्थान आणि छत्तीसगड येथे यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. ती भाजपने आता खेचली आहे. तेलंगणात अवघी 1 जागा होती. तेथे आता 8 जागा मिळाल्या आहेत. मिझोराममध्येही पूर्वी 1 जागा होती. आता पक्षाला तेथे 2 जागा आहेत.