For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेहाच्या हत्येचे भाजपकडून राजकारण

12:03 PM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेहाच्या हत्येचे भाजपकडून राजकारण
Advertisement

काँग्रेसकडून निषेध : नेहाला न्याय देण्याची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Advertisement

बेळगाव : हुबळी येथील बीव्हीबी महाविद्यालयाच्या आवारामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या नेहा हिरेमठ हिच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. तर भाजपकडून या विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप करत त्याचे खंडण करण्यात आले. काँग्रेस भवन येथून मोर्चा काढून हुबळी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेहावर हल्ला केलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याला फाशी देण्यात यावी, अशी घोषणा देत अनेक कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. संशयित आरोपी फय्याज याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेहाच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

भावनात्मक गोष्टींमध्ये राजकारण करणे चुकीचे

Advertisement

हताश झालेल्या भाजपकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. ही अत्यंत दु:खद घटना आहे. अशावेळीही भाजपकडून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. कोणताच मुद्दा नसल्याने अशा भावनात्मक गोष्टींमध्ये राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. नेहा हिरेमठ हिच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आपण हा मोर्चा काढला असल्याचे आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. भाजपकडून या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला जात असल्याबद्दल याचे त्यांनी खंडण केले. मृत घटनेचे राजकारण करणे हा भाजपचा हिडन अजेंडा आहे. यामध्ये ते कदापि यशस्वी होणार नाहीत. जनता पाहत आहे. दु:खी कुटुंबाला न्याय मिळावा. भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी आपली विनंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेजबाबदारपणे भाषण करणे सोडून द्यावे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा आणावा. राज्य सरकारकडून विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्वागतार्ह बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सबलीकरणासाठी काँग्रेस सरकारकडून प्रयत्न

महिला सबलीकरण करण्यासाठी काँग्रेस सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेतले जातील. भाजपकडे बोलण्यासाठी विषय नसल्याने भावनात्मक विषयांचे राजकारण करत आहेत. हे सोडून त्यांनी विकासाचे राजकारण करावे. गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे जनतेला दाखवावीत, असे आमदार राजू सेठ यांनी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., मलगौडा पाटील, रमेश गोरल, अमृत मुद्दण्णावर, गुंडू कुरेन्नावर, भैरु डोणकरी, सागर रेडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.