मेकळी येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून स्वागत
बेळगाव : राज्य सरकारकडून गोरगरिबांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विकासाभिमुख योजनांना पसंती देण्यात येत आहे. त्यामुळेच मेकळी येथील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी-कवटगीमठनगर येथील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या गृह कार्यालयामध्ये मेकळी येथील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील अनेक तरुणांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, ही आनंदाची बाब आहे. पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर पक्षाची संघटना करून चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला समर्थन देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांचे विकासकार्य याला पसंती देऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी रमेश नायक, बसाप्पा कांबळे, महादेव कांबळे, परशुराम कांबळे, अरुण कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.