For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारचे कामगार गटारी साफ करण्याच्या योग्यतेचे !

06:40 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
बिहारचे कामगार गटारी साफ करण्याच्या योग्यतेचे
Advertisement

द्रमुकचे दयानिधी मारन यांच्या विधानामुळे विरोधी आघाडीत गोंधळ, राजदची द्रमुकवर टीका

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

विरोधी पक्षांची आघाडी अद्याप पूर्णपणे आकारालाही आलेली नसताना तिच्या घटकपक्षांच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक आणि अवमानास्पद विधानांमुळे आघाडीत बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. सनातन धर्माला कोरोना किंवा महारोगाची उपमा देणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कझगम पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी तामिळनाडूत काम करणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांसंबंधी केलेले एक घृणास्पद विधान सध्या गाजत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगार कमी शिकलेले असल्याने त्यांना गटारी साफ करणे आणि टॉयलेट धुणे अशी कामे करण्याची त्यांची योग्यता आहे, अशा अर्थाच्या या विधानामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील राजकीय पक्ष चांगलेच संतप्त झाले असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

दयानिधी मारन यांनी एका व्हिडीओत हे विधान केले असल्याचे दिसून येते. तथापि, हा व्हिडीओ बराच जुना असल्याची सारवासारव आता द्रमुकला करावी लागत आहे. मात्र, तो नेमका केव्हाचा आहे, हे स्पष्टीकरण हा पक्ष देऊ शकलेला नाही. परिणामी, या पक्षावर चहूबाजूंनी टीकेला वर्षाव होत असून विरोधी पक्षांच्या आघाडीतलाच राष्ट्रीय जनता दल द्रमुकवर तुटून पडला आहे.

भाजपचीही कडाडून टीका

दयानिधी मारन यांचा हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यापासून तो सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. भारतीय जनता पक्षानेही मारन यांच्या या विधानावर कडाडून टीका करताना मारन यांच्या हीन मनोवृत्तीचे दर्शन या विधानांमधून होते, अशा टिप्पण्या सोशल मिडियावर उमटत आहेत. भारतीय जनता पक्षाने या संदर्भात विरोधी पक्षांच्या आघाडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. विरोधी आघाडीतीलच दोन पक्ष अशा प्रकारे एकमेकांना जाहीर गालीप्रदान करत असल्याने आणि एक पक्ष एका राज्यातील जनतेचाच अपमान करीत असल्याने या आघाडीचे भवितव्य काय असेल, हे स्पष्ट होत असल्याचा टोमणा भाजपने मारला आहे.

तेजस्वी यादव संतप्त

द्रमुकचे नेते करुणानिधी हे सामाजिक न्याय या संकल्पनेचे पायिक होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अशी विधाने करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांविषयी जी विधाने केली आहेत, त्यांचा मी निषेध करतो. कोणत्याही नेत्याने, दुसऱ्या राज्यातील जनतेचा अपमान होईल, अशा प्रकारची विधाने करु नयेत. भारत हा एकात्म देश आहे. या देशातील जनता एक असून प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली कोणीही भारताच्या जनतेचा अपमान करु नये, अशी कठोर टीका आणि इशारा तेजस्वी यादव यांनी दिला आहे.

उत्तर भारतात प्रतिक्रिया

आगामी लोकसभा निवडणूक उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा रंग घेणार आहे काय, हा प्रश्न या निमित्ताने राजकीय अभ्यासक विचारीत आहेत. या निवडणुकीला असा रंग यावा असा प्रयत्न हेतुपुरस्सर काही राजकीय पक्षांकडून होत असून द्रमुक त्यात आघाडीवर आहे. याची तीव्र प्रतिक्रिया उत्तर भारतात उमटत असून उत्तर भारतातील राजकीय पक्षांनी पक्षभेद विसरुन अशा विधानांवर जोरदार आवाज उठविण्यास प्रारंभ केल्याने विरोधी पक्षांच्या आघाडीचे भवितव्य काय असणार, याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.

जाणूनबुजून प्रयत्न

उत्तर विरुद्ध दक्षिण अशी तेढ जाणूनबुजून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी आघाडीतील एकतेवर यामुळे प्रश्नचिन्ह प्रारंभापासूनच लागल्याचे दिसून येते. अद्याप आघाडीतील जागावाटप झालेले नाही. ते नेमके केव्हा होणार, याची कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही. काँग्रेस पक्ष उत्तर आणि दक्षिण अशा दोन्हीत असल्याने त्याची अशा विधानांमुळे सर्वाधिक कोंडी होत असल्याचे दिसून येते. याची चिंता त्या पक्षालाही सतावू लागली आहे.

द्रमुकमुळे नवा वाद

ड उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेविषयी द्रमुक नेत्याचे अवमानास्पद उद्गार

ड बिहार आणि उत्तर प्रदेशात संतप्त प्रतिक्रिया, आघाडीतील बिघाडी रस्त्यावर

ड दयानिधी मारन यांचा व्हिडीओ जुना असल्याची द्रमुक पक्षाची सारवासारवी

ड भारतीय जनता पक्षाचेही दयानिधी मारन यांच्यावर जोरदार, कठोर टीकास्त्र

Advertisement
Tags :

.