For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बब्बर खालसाविरोधात एनआयएचे मोठे अभियान

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बब्बर खालसाविरोधात एनआयएचे मोठे अभियान
Advertisement

सहा राज्यांमधील 32 ठिकाणांवर धाडी :  मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही हस्तगत

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

बब्बर खालसा या खलिस्तानवादी दहशतवादी संघटनेच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) व्यापक अभियानाचा प्रारंभ केला आहे. त्या अंतर्गत या संघटनेच्या 32 ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ही स्थाने 6 राज्यांमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. बब्बर खालसा प्रमाणेच बिश्नोई टोळीवरही छापे घालण्यात आले आहेत. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान या प्रदेशांमध्ये एनआयएने दोन दिवसांपूर्वीपासूनच बब्बर खालसा आणि बिश्नोई टोळी यांची कोंडी करण्यास प्रारंभ केला होता. भारतात दहशत माजविण्याचा या संघटनेचा डाव होता.

Advertisement

शस्त्रे हस्तगत

या धाडींमध्ये आतापर्यंत दोन पिस्तुले, दोन मॅगझिन्स, चार रायफल्स, मोठ्या प्रमाणावर बंदुकांच्या गोळ्या आणि स्फोटके एनआयएने हस्तगत केली आहेत. 4.6 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. गुरुवारी सकाळपासूनच या धाडसत्राचा प्रारंभ करण्यात आला. ते अनेक तास चालले. मोठ्या प्रमाणावर प्रक्षोभक साहित्यही या धाडींच्या माध्यमातून जप्त करण्यात आले आहे.

बब्बर खालसावर अनेक आरोप

बब्बर खालसा इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असून भारतात या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही या संघटनेच्या देशविघातक कारवाई सुरू आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे ही धडक कारवाई करण्यात आली. या धाडसत्रामुळे या संघटनेची पाळेमुळे हादरली असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. एनआयएने या संघटनेवर अनेक आरोप ठेवले असल्याचे स्पष्ट केले.

कटकारस्थान उघडकीस

10 जुलै 2023 या दिवशी एनआयएने हरविंदर सिंग रिंदा आणि लखबीरसिंग लांडा यांच्याविरोधात कारवाईला प्रारंभ केला होता. त्यांच्यावर बब्बर खालसाचे हस्तक असण्याचा आणि भारतात हिंसाचार माजविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तसेच भारतात अमली पदार्थांची तस्करी करणे आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणणे असेही आरोप आहेत. त्यामुळे कारवाई केली जात आहे.

लॉरेन्स बिष्णोई टोळी

दहशतवादासमवेतच एनआयएने गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या विरोधातही कारवाई केली आहे. या टोळीच्या सहा स्थानांवर छापे टाकण्यात आले आहेत. या टोळीवरही युएपीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या टोळीशी संबंधित गोल्डी ब्रार याला अलिकडेच भारताने दहशतवादी घोषित केले आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिधू मुसेवाला याच्या हत्येत या टोळीचा सहभाग आहे. या टोळीच्या हस्तकांवर कटकारस्थान रचणे, लूटमार, हत्या आणि इतर गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.

एकेकटे दहशतवादी

दहशतवादाचा सध्या एक नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. संघटना स्थापन न करता, किंवा कोणत्यातरी दहशतवादी संघटनेशी स्वत:ला जोडून न घेता, स्वतंत्ररित्या दहशतवादी कृत्ये करणाऱ्या एकेकट्या दहशतवाद्यांचे प्रमाण वाढले आहे. ते स्वतंत्र असल्याने कोणत्याही संघटनेवर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करता येत नाही. काही दहशतवादी काहीवेळा एकेकटे तर काहीवेळा कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचे हस्तक म्हणून काम करतात. गोल्डी ब्रार हा कॅनडास्थित दहशतवादी हा अशा प्रकारचा आहे. भारतात त्याच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.