पंजाबमध्ये भाजपला मोठा लाभ
आंदोलनादरम्यान ‘पंजाब किसान दला’चे विलीनीकरण
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब किसान दल या राजकीय पक्षाचे भाजपमध्ये रविवारी विलीनीकरण झाले आहे. पंजाब किसान दलाचे अध्यक्ष रणजीत सिंह सरां यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. भाजपच्या शेतकरी समर्थक विचारसरणीमुळे आम्ही आमची संघटना पंजाब किसान दलाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी काम करत आहे. राजकीय नेत्यांच्या संगनमतामुळे केंद्र सरकारला जाणूनबुजून बदनाम करण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. एका कटाच्या अंतर्गत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे सरां यांनी सांगितले आहे.
भाजप अनुसूचित जाती मोर्चा पंजाबचे उपाध्यक्ष परमजीत सिंह कैंथ यांच्या प्रेरणेमुळे पंजाब किसान दलाने स्वत:च्या सहकाऱ्यांसाब्sात भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्ष महासचिव परमिंदर सिंह बराड यांनी पंजाब किसान दलाचे अध्यक्ष रणजीत सिंह सरां समवेत पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. या सर्व नेत्यांना योग्य सन्मान दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. केंद्रीय मंत्री सोम प्रकाश, सह-प्रभारी नरेंद्र सिंह रैना, भाजप संघटन प्रभारी श्री निवासांलू आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पंजाब किसान दल भाजपमध्ये विलीन झाला आहे.