‘भारत एक खोज’ उत्तुंग रंगमंचीय कलाविष्कार..!
ढवळीकर उच्च माध्यमिकच्या स्नेहसंमेलनातून वेगळी संकल्पना
मडकई : भारताच्या वैभव व सामर्थ्यशाली इतिहासाची पाने चाळताना प्राचिन काळापासून आधुनिक युगापर्यंत अनेक राजवटी सत्तास्थानी आल्या. स्वातंत्र्य चळवळीपासून प्रजासत्ताकापर्यंतचा दैदिप्यमान प्रवास, अशा भारत देशाला जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून नावलौकीक मिळाला. अंगावर रोमांच उभा करणारा हा इतिहास सौ. अन्नपूर्णा माधवराव ढवळीकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात प्रभावीपणे सादर करण्यात आला. राजीव गांधी कला मंदिरच्या मा. दत्ताराम नाट्यागृहात नुकतेच हे संमेलन पार पडले. ‘भारत एक खोज’ या दोन तासाच्या नृत्यशैलीतून कलाविष्कार दाखवताना विद्यार्थ्यांना हा इतिहास अनुभवताना त्यांच्यात राष्ट्राभिमान जागृत झाला. मनोरंजनातून प्रबोधन घडविणारा हा उत्तम प्रयोग होता. विश्वाची निर्मिती ते भारताच्या लोकशाही पर्यंतचा कालखंड, युगे सरली, काळानुरुप अनेक बदल घडले. असा सलग प्रवास व प्रत्येक प्रवाहात घडत गेलेले बदल सर्वांच्याच स्मृतीपटलावर कोरले गेले. भावनाप्रधान बनलेल्या पालक व रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
‘भारत एक खोज’चे मंत्री सुदिन ढवळीकर साक्षीदार
‘भारत एक खोज’ या प्रयोगशिल सादरीकरणाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी उपस्थिती लावली. चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या स्नेहसंमेलनाची दिशा व कलाविष्कार वेगळ्या धर्तीवर असायचा. त्यानतंर फक्त मनोरंजन घडत गेले. परत एकदा काळाची दिशा बदलेली आहे. मनोरंजनातून प्रबोधन होत आहे. हीच खरी काळाची गरज आहे. भारत एक खोज या कार्यक्रमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खूली केली आहेत. कालौघात माणसाला इतिहासाचे विस्मरण होत असते. अशा पार्श्वभूमिवर अन्नपूर्णा ढवळीकर विद्यालयाचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याची प्रशंसा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली. भारताच्या याच इतिहासातील काही क्षण पाठ्यापुस्तकात संक्षिप्त रुपाने आहेत. सुरुवातीपासूनचा ओझरता पण सलग इतिहास पालकांच्या ज्ञानात भर घालणारा आहे. नृत्यकलेतून प्रकाश टाकलेल्या कथा व त्यांच्यासाठी पोषक असलेले सांकेतीक नेपथ्य व प्रकाश योजना कौतुकास्पद आहे. प्रत्येक विद्यालयातून असे स्नेहसंमेलन घडत राहावे. तरच भावी पिढीतील देशभावना जागृत होण्यास साहाय्य होईल. विद्यार्थी व शिक्षकांचे मंत्री ढवळीकर यांनी खास अभिनंदन केले. ‘भारत एक खोज’ पुराण इतिहास व वर्तमान काळ. प्रत्येक प्रसंगानुरुप वेशभूषा, कालचक्र व अशोकस्तंभ आणि प्रकाश योजना अशा कलाविष्कारातून विद्यार्थ्यांनी गाठले अत्युच्य शिखर...!