भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून प्रारंभ
राहुल गांधी करणार नेतृत्त्व : पक्षाध्यक्ष खर्गे दाखवणार हिरवा झेंडा
वृत्तसंस्था/ इंफाळ
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा रविवार, 14 जानेवारीपासून मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शनिवारपासूनच काँग्रेसचे नेते येथे एकवटले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय तणावाची स्थिती असल्यामुळे राज्य सरकारने काही अटी-शर्थींवर या यात्रेला अनुमती दिलेली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे थौबल येथे रविवारी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू राहणारी ही यात्रा 20 मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे. तेथेच या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील ही यात्रा एकूण 6,713 किलोमीटर अंतर कापणार असून 15 राज्यांमधील 110 जिल्ह्यांना व्यापणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रा सुरुवातीला इंफाळमधून सुरू करण्याची काँग्रेसची योजना होती. मात्र, मणिपूरमधील सुरक्षा व तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष केईसम मेघचंद्र यांनी दिली. थौबल जिल्हाधिकाऱ्यांनी खोंगजोम येथील खासगी मैदानातून यात्रेचा शुभारंभ करण्याची परवानगी दिली असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.