अर्बन नक्षलवाद्यांपासून सावध रहा
पणजीतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना
प्रतिनिधी/ पणजी
अनुसूचित जमाती बांधव हा नेहमी भाजपसोबत राहिला आहे. अनुसूचित जमाती बांधव हे खरेखुरे भाजपचे कार्यकर्ते व मतदार आहेत. तरीही विरोधकांकडून जातीय आणि धर्माच्या आधारावर त्यांना भाजपपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे विरोधक हे अर्बन नक्षलवाद्यांच्या भूमिकेत समाजात वावरत आहेत, त्यांच्यापासून सावध रहा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, माजी मंत्री दामू नाईक, शिवाजीराव पाटील व भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यात अर्बन नक्षलवादी फिरत आहेत. ते अनुसूचित जमातीच्या बांधवांना लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन या बांधवांना जवळ करणे गरेचे आहे. पक्षाच्या प्रत्यक्ष कामात त्यांना सहभागी करून घ्यावे. कारण समाजाला विद्ध्वंसक करण्याच्या उद्देशानेच हे अर्बन नक्षलवादी गोव्यात पोहोचले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपने राज्यातील संपूर्ण जनतेचा विकास केलेला आहे. शेतकरी तसेच राज्यातील मच्छीमारबांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती त्यांना द्यावी, असेही ते म्हणाले.
विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी गोव्याचे दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे भाजपच जिंकणार आहे. परंतु तरीही आपल्याला या मतदारसंघांत मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करायला आहे. दक्षिण गोव्यात यंदा इतिहास घडवताना 60 हजार मताधिक्याने विजय प्राप्त करावयचा आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही भाग घेतला होता.
भाजप हा सर्वांचा पक्ष
भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशातील महिला शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण या चार खांबांवर उभा आहे. देशातील सर्वसामान्यांबरोबरच सर्वांना सामावून घेणारा हा एकमेव सर्वांचा पक्ष आहे. महिला शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण या तत्त्वावरच पक्षाचे कार्य सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी जाती-धर्माचे राजकारण थांबवावे. विरोधकांच्या कोणत्याही कृत्यांना आम्ही खपवून घेणार नसून, भाजपने केलेल्या विकासाच्या आधारावरच आम्ही टिकून आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.