केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहा! आरबीआयचा इशारा
आरबीआयने नागरिकांना केले सतर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत बँकिंग क्षेत्राचे नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना सावध केले आहे. अलीकडच्या काळात अनेक ग्राहक केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणुकीचे बळी ठरले आहेत. यासंबंधी अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी आणि फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आरबीआयने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये नागरिकांना ताबडतोब नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर किंवा सायबर क्राइम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर डायल करून तक्रार नोंदवण्याचा सल्ला आरबीआयने दिला आहे.
केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली लोकांची कशी फसवणूक होत असल्याने आरबीआयने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अशा प्रकरणांमध्ये फसवणूक करण्यासाठी ग्राहकांना प्रथम फोन कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे संदेश प्राप्त होतो. या माहितीमधून ग्राहकांची वैयक्तिक माहिती उघड करून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय, त्यांच्या खात्याचे लॉगिन तपशील विचारले जातात किंवा त्यांना संदेशाद्वारे एक लिंक पाठवून त्यांच्या मोबाईल फोनवर अनधिकृत किंवा असत्यापित अॅप स्थापित करण्यास सांगितले जाते. तसेच काही घटनांमध्ये खाते ब्लॉक, फ्रीज किंवा बंद करण्याची धमकी देऊन ग्राहकावर दबाव आणला जातो. ग्राहकाची वैयक्तिक माहिती किंवा लॉगिन तपशील संबंधिताला दिल्यास फसवणूक होण्याचा धोका बळावतो, असे आरबीआयने म्हटले आहे.