म्यानमारमधून सुपारीची तस्करी उघड
बेंगळूर विमानतळावर 460 पिशव्या जप्त : बेळगावच्या सुपुत्राकडून कारवाई
बेळगाव : बेंगळूर येथील वाणिज्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुपारीची तस्करी उघडकीस आणली आहे. म्यानमारहून मागविण्यात आलेली 11 हजार 500 किलो सुपारी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आली आहे. वाणिज्य कर विभागाचे साहाय्यक आयुक्त असणाऱ्या बेळगावचे सुपुत्र अशोक मिरजी यांनी ही कारवाई केली आहे. कोणत्याही आवश्यक कागदपत्रांशिवाय 460 पिशव्यांमधून 11 हजार 500 किलो सुपारी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आली. ही सुपारी आसाम, मणिपूरहून मध्यप्रदेश व बेंगळूरमधील काही व्यापाऱ्यांना पाठविण्यात येत होती. सुपारी मागविण्यासाठी आवश्यक कोणतीच कागदपत्रे नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आसाम, मणिपूर व मध्यप्रदेश येथील जीएसटी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मूळचे बेळगावचे व सध्या बेंगळूर येथील वाणिज्य कर विभागाचे साहाय्यक आयुक्त असणाऱ्या अशोक मिरजी यांनी ही कारवाई केली आहे. म्यानमारहून या सुपारीची तस्करी केल्याचा संशय असून कर्नाटकात उपलब्ध होणाऱ्या उत्तम दर्जाच्या सुपारीचे दर प्रतिकिलो 250 ते 300 रुपये इतका आहे. विमानतळावर जप्त करण्यात आलेली सुपारी 25 ते 30 रुपये प्रतिकिलो असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तम दर्जाच्या सुपारीत मिसळून त्याची विक्री करण्यात येते.
ई-वे बिलांचा वापर करावा
कर बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाणिज्य कर विभागाचे आयुक्त सी. शिखा यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून शेतकऱ्यांनी आपण पिकविलेल्या कृषी मालाची वाहतूक करताना ई-वे बिलांचा वापर करावा. सुपारी, खोबरे, काजू, तंबाखूची पाने, सुकी मिरची, तेलबियाणे, मसाले पदार्थ व कापूस वाहतूक करताना ई-वे बिलाबरोबरच आरटीसीचाही वापर करावा लागतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.