बंगाली पासपोर्ट एजंटला दिल्ली विमानतळावर अटक
बनावट कागदपत्रांद्वारे व्हिसा बनविल्याचे आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विमानतळ पोलिसांनी एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत पश्चिम बंगालमधील एका एजंटला अटक केली आहे. शेख आरिफ असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. तो पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा येथील रहिवासी आहे. त्याच्याविऊद्ध 22 फेब्रुवारी रोजी भादंवि 420/468/471/34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. शेख आरिफ याने म्यानमारच्या दोन परदेशी नागरिकांचे बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले होते. त्यानंतर पासपोर्ट बनवून परदेशात पाठवण्यात आले. अशी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि डिजिटल अॅप्सचा वापर करण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून दोन्ही नागरिक रशियामध्ये पोहोचल्यानंतर दोघांनाही तेथून परत पाठवण्यात आल्याचे डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले. या बनावटगिरीमध्ये लक्षावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा खुलासा प्राथमिक चौकशीत झाला आहे.
अटक केलेला एजंट एका सिंडिकेटच्या संपर्कात राहून म्यानमार आणि बांगलादेशात राहणाऱ्या रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे भारतासाठी बनवायचा. त्यानंतर येथून पासपोर्ट आणि व्हिसा बनवून परदेशात पाठवायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या दोन नागरिकाच्या कागदपत्रांची येथे तपासणी केली असता त्याने भारतात शुभो जीत दास आणि बबिता राय यांच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवल्याचे उघड झाले. चौकशीदरम्यान, त्याने एजंटकडून कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. दोघेही रोहिंग्या आणि म्यानमारचे रहिवासी आहेत.