महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने बेळगावकर हैराण

10:32 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनपाने उपाययोजना राबवणे अत्यावश्यक

Advertisement

बेळगाव : भटक्या कुत्र्यावर गरम तेल ओतल्याच्या वृत्ताची शहर परिसरात बरीच चर्चा सुरू आहे.हॉटेल मालकांनी केलेले हे कृत्य समर्थनीय म्हणावे की त्याच्या या कृत्याचा निषेध करावा, असा प्रश्न पडला आहे. वास्तविक भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने बेळगावकर हैराण झाले आहेत. महानगरपालिका कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबवते. पण ती किती दिवसासाठी असते, त्यामुळे किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले? हा तपशील स्पष्टपणे पुढे येत नाही. दिलेल्या तपशीलापेक्षा शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. दुर्दैवाने ही कुत्री लहान मुलांनाही लक्ष्य करत आहेत. जोपर्यंत या कुत्र्यांचा बंदोबस्त पूर्णत: होत नाही, तोपर्यंत नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावाच लागणार आहे.  एकेका ठिकाणी दहा ते पंधरा कुत्री असतात. त्यामुळे केवळ हॉटेल चालकालाच नव्हे तर ग्राहकांनाही त्याचा त्रास होतो. कुत्री पाहताच मुलांना घेऊन आलेले पालक त्या हॉटेलमध्ये जाणे टाळतात. त्यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे.

Advertisement

याचाच कडेलोट होऊन हॉटेल चालकाने कुत्र्याच्या अंगावर तेल ओतले असावे, असे मानले तरी ही बाब समर्थनीय नक्कीच नाही. या प्रकाराची कसून चौकशी होणे व पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी मनपाने उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे. निवडणूक कामामुळे मनपातील बरीच कामे किंवा मोहिमा थंडावल्या होत्या. आता त्या सर्व कामांना धडाक्याने सुरुवात करण्याची गरज निर्माण झाली आहे. मग ती पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेली कामे असोत किंवा मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांचा बंदोबस्त असो. ज्यांना पाळीव प्राणी पाळण्याची हौस आहे, त्यांनी ती जरुर पाळावीत. परंतु, अशा श्वानप्रेमी मंडळींनी भटक्या कुत्र्यांचीही जबाबदारी घ्यावी, असा निर्णय केरळमधील न्यायालयाने दिला आहे. त्याची अंमलबजावणी बेळगावमध्ये होण्यास हरकत नसावी.

समन्वयानेच तोडगा निघणे शक्य

केवळ भटक्या कुत्र्यांबद्दल भूतदया दाखवून त्यांना विरोध करणाऱ्यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा या भटक्या कुत्र्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यांचे लसीकरण करणे, निर्बिजीकरण करणे हे काम प्राणीदया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाती घ्यावे. ही समस्या सामाजिक आहे, त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयानेच त्यावर तोडगा निघणे शक्य आहे. त्याबाबत मनपा विचार करेल का? हा प्रश्न आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article