बेळगाव विमानतळाचा राज्यात तिसरा क्रमांक
प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ, नऊ शहरांना विमानसेवा
बेळगाव : बेळगाव विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात 31,060 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकारणाकडे झाली आहे. एप्रिल महिन्यात 2.5 टक्क्यांनी प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. शाळांना पडलेल्या सुट्या व यात्रांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. विमानतळाहून देशातील प्रमुख दहा शहरांना विमानसेवा दिली जात आहे. जून महिन्यापासून यापैकी बेळगाव-सूरत ही विमानफेरी रद्द करण्यात आली आहे. परंतु, इतर शहरांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. सध्या बेंगळूर, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, जोधपूर, जयपूर, तिरुपती या शहरांना विमानसेवा दिली जात आहे. जानेवारी महिन्यात 29,614 प्रवाशांनी विमानप्रवास केला होता. फेब्रुवारीमध्ये काही प्रमाणात घट झाली. या महिन्यात 29,530, मार्चमध्ये 30,290 तर एप्रिल महिन्यात 31,060 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. एप्रिल महिन्यात 30 हजारांचा टप्पा गाठण्यात विमानतळाला यश आले. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 1 लाख 20 हजार 520 प्रवाशांनी प्रवास केला. तर 1 हजार 594 विमानफेऱ्या झाल्याची नोंद आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतुकीतही वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात 1.7 मेट्रिक टन कार्गो वाहतूक करण्यात आली. मागील महिन्यात तब्बल 2 टन कार्गो वाहतूक झाली होती. त्यामुळे कर्नाटकातील बेळगाव विमानतळ प्रवाशांच्या संख्येबाबत तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.