For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेसाठी वर्चस्वाची लढाई

06:49 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेसाठी वर्चस्वाची लढाई
Advertisement

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीकडे मतदारांचा कौल होता. विधानसभा निवडणुकीत पारडे फिरले. मतदारांनी महायुतीला कौल दिला. आता महापालिका निवडणुकीकडे, त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेसह, भाजप आणि मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग होत असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने मुंबईतील स्थानिक प्रश्नावर जोरदार मोहीम उघडून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Advertisement

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. या निमित्ताने स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर सुरू झाले आहे. शिवसेना तसेच इतर पक्षातील जवळपास 50 नगरसेवकांनी आत्तापर्यंत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला सोडुन शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या मतदार संघात ठाकरे गटातील नवीन नेतृत्वाने आता तयारी सुरू केली आहे, बहुतांश शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्याने आता अक्षय तृतीय्येच्या मुहुर्तावर अनेक ठिकाणी नवीन तात्पुरत्या कार्यालयांचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डात रस्त्यांची, गटारांची तसेच मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांचा सपाटा लावण्यात आला असून, दुसरीकडे ही कामे सुरू असताना या कामांचा दर्जा तसेच पारदर्शकपणाबद्दल शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे काही बाबतीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र येताना दिसत आहे.

शिवसेना ठाकरे गटाने नागरी समस्यांबाबत आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. गेल्याच महिन्यात मुंबई महापालिकेतील प्रत्येक वॉर्डातील कार्यालयांवर हंडा मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्षे शिवसेना ठाकरे गटाची निर्विवाद सत्ता आहे. जानेवारी 2022 ला महापालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, गेली तीन वर्षे महापालिकेवर प्रशासक आहे. 2025 या वर्षात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील विविध घटकांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आणि शिवसेना युतीची राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर जोरदार बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. मग तो मुंबईतील आगरी कोळी बांधवांचा प्रश्न असो किंवा म्हाडाच्या इमारतीतील रहिवाशांचा, मासेमारीला शेतीचा दर्जा देण्यासारखा निर्णय असो किंवा मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठीचा निर्णय असो. राज्य सरकारने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील प्रत्येक विभागाचा 100 दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे, या निकालानंतर मुख्यमंत्री आमदारांच्या कामाचे सुध्दा वर्षभराचे म्ल्युमापन करू शकतात. त्यामुळे भाजपचे मुंबईतील आमदार अलर्ट मोडवर असून पायाला भिंगरी लावून मतदार संघात फिरत आहेत, भाजपने आपल्या नवीन संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय नियुक्ती नुकतीच जाहीर केली आहे, तर मनसेने देखील गटप्रमुखांचा विभागनिहाय मेळावा घेण्यास सुरूवात केली आहे. प्रतिमहापालिका नावाचा कार्यक्रम मनसेने आयोजित करताना मुंबई महापालिकेचा कारभार तसेच मुंबईतील प्रश्न यावर मोठे चर्चासत्र घडवून आणले आहे.

गेली तीन वर्षे प्रशासन असल्याने मुंबईतील पायाभूत आणि नागरी सुविधांचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. प्रशासनावर कोणाचा अंकुश नसल्याने प्रत्येक वॉर्डमध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा रोज सामना करावा लागत आहे. त्यातच स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला नागरिक वैतागले आहेत, नगरसेवक नसल्याने नगरसेवकांची कामे आमदारांना करावी लागत आहेत. दोन्ही शिवसेनेत स्थानिक पातळीवर होत असलेल्या संघर्षामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यमान नगरसेवक शिंदे गटात गेल्याने तरूण नेतृत्वाला वाव मिळण्याची मोठी संधी असली तरी, विकासकामांसाठी तसेच इतर गोष्टींसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेला आर्थिक समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे. इच्छुक असलेल्या भाजपचे विद्यमान आणि ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली असून पावसाळ्यात नागरिकांना छत्र्या तसेच नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यासाठीची तयारी केली आहे. छत्र्या आणि वह्यांची ऑर्डर देखील देण्यात आली आहे.

महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांची युती असून शिवसेना भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढल्याने महापालिका निवडणूका एकत्र लढणार असल्याचे सध्या तरी बोलले जात आहे. त्या तुलनेत ठाकरे गट आणि इतर पक्षांचे उमेदवार अजून संभ्रमात आहेत. दोन ठाकरे बंधु एकत्र आल्यास स्थानिक पातळीवरील चित्र नक्कीच बदलणार आहे. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळेल का नाही याची शाश्वतीच या नेत्यांना नसल्याने हे नेते सध्या वेट अॅन्ड वॉचच्या पावित्र्यात आहेत.

महापालिका निवडणूका जवळ येतील तसा दोन्ही शिवसेनेतील संघर्ष हा वाढणार असून गेल्याच आठवड्यात ‘मातोश्री’ समोरच शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी’, असे बॅनर लावण्यात आले. बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना शिवबंधन बांधतानाचा फोटोसुद्धा वापरला आहे. तसेच या बॅनरवर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यात “बघताय काय? सामील व्हा,” असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बॅनरला उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यात वांद्रे येथील पाणीपुरवठ्याचा विषय मांडला होता. वांद्रे पूर्वेला मिळणार 5 एमएलडी अतिरिक्त पाणी, अशा आशयाची बॅनरबाजी शिवसेना ठाकरे पक्षाकडून लावण्यात आली आहे. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात  वांद्रे येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रंगलेले बॅनरवॉर भविष्यात स्थानिक पातळीवर रंगण्याची शक्यता आहे. मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट वर्चस्वाची लढाई करत आहेत.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.