काँग्रेसमध्ये रामाचे नाव घेण्यावर बंदी : मोदी
राजस्थानातील सभेत मोठा शाब्दिक हल्ला
वृत्तसंस्था/ चुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी राजस्थानच्या चुरू येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे. पंतप्रधान मोदींनी येथे काँग्रेसच्या घोषणापत्रावर टीका करत केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख केला आहे. भाजप जे बोलतो ते करून दाखवितो. दुसऱ्या पक्षांप्रमाणे केवळ घोषणापत्र जारी करत नाही. आम्ही संकल्पपत्र घेऊन येतो, आम्ही 2019 मध्ये संकल्पपत्र घेऊन आलो होतो आणि त्यातील बहुतांश गोष्टी पूर्ण केल्या आहेत. आम्ही आमची सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी झोकून देतो. काँग्रेसचे नेते भगवान रामासंबंधी पुरावे मागायचे. तर आम्ही अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले आहे. काँग्रेसने आता अयोध्या आणि राम मंदिराचा उच्चार करण्यास मनाई करणारी सूचना स्वत:च्या नेत्यांना जारी केली असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
देशहितापेक्षा अधिक काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाला प्राथमिकता दिली आहे. काँग्रेसच्या सरकारने न्यायालयात प्रभू श्रीराम हे काल्पनिक असल्याचे सांगितले होते. आता काही महिन्यांपूर्वीच अयोध्येत भव्य राम मंदिराचे स्वप्न साकार झाले आहे. पूर्ण देश प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा करत असताना काँग्रेस पक्ष उघडपणे आमच्या श्रद्धेचा अपमान करत होता अशी टीका मोदींनी केली आहे.
मोदीने प्रत्येक गॅरंटी केली पूर्ण
10 वर्षांमध्ये खूप काही झाल्याचे लोक म्हणतात. परंतु आतापर्यंत जी कामे झाली आहेत तो केवळ एक ट्रेलर आहे. आम्हाला खूप काही करायचे आहे. आमची अनेक स्वप्नं आहेत. आम्हाला देशाला खूप पुढे न्यायचे आहे. देशात सध्या मोदीच्या गॅरंटीची चर्चा होत आहे. राजस्थान याचे अत्यंत मोठे उदाहरण आहे. आम्ही राजस्थानच्या माताभगिनींना गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी पूर्ण झाली आहे. पेपर लीकप्रकरणी चौकशी करवू अशी गॅरंटी युवांना दिली होती आणि ही गॅरंटी देखील पूर्ण झाली आहे. शेखावटी आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांची पाण्याची समस्या संपविली आहे. आम्ही केवळ या प्रकल्पाला मान्यता दिली असे नाही तर वेगाने काम देखील सुरू केले आहे. या प्रकल्पामुळे पेयजल तसेच सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हरियाणाशी चर्चा करत पाणी आणण्याचा मार्ग मोकळा केल्याचे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेसने लुटला गरीबांचा पैसा
सध्या पूर्ण देश ‘विकसित भारत’च्या मिशनवर काम करत आहे. ‘विकसित भारत’ मिशनमध्ये राजस्थानची अत्यंत मोठी भूमिका आहे. राजस्थान विकसित झाल्यावर पूर्ण देश विकसित होणार आहे. आमच्या सरकारने फुटपाथवर जगणाऱ्या लोकांनाही स्वत:चे घर मिळवून दिले आहे. हे घर माताभगिनी आणि मुलींच्या नावावर आहे. पूर्वी गरीबांच्या वाट्याचा पैसा काँग्रेसचे नेते लुटत होते. परंतु आता पैसा थेट गरीबाच्या खात्यात जमा होत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
वृत्ती चांगली तर फळही चांगले
राजस्थानच्या 4.5 कोटी गरजूंना दर महिन्याला मोफत धान्य दिले जात आहे. पूर्वी जे काम झाले नव्हते ते आम्ही करून दाखविले आहे. वृत्ती चांगली असली तर परिणामही चांगले मिळतात. भारत इतक्या वेगाने विकास करत असल्याचे पाहून जग अचंबित झाले आहे. मागील 10 वर्षांमध्ये लोकांनी देश बदलताना पाहिला आहे. तर त्यापूर्वी काँग्रेसच्या शासनकाळात मोठमोठे घोटाळे आणि लुटीमुळे देशाची स्थिती बिघडली होती. देशाची प्रतिमा खालावली होती असा दावा मोदींनी केला आहे.
सैन्याचा अपमान ही काँग्रेसची ओळख
जम्मू-काश्मीरध्ये आमचे जे जवान हुतात्मा झाले होते, त्यात राजस्थानचे वीर जवान देखील सामील होते. आता जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाले आहे. आमचे जवान वन रँक वन पेन्शनची मागणी करायचे. काँग्रेसने ही मागणी कधीच पूर्ण होऊ दिली नाही. आमचे सरकार येताच आम्ही सैनिकांना वन रँक वन पेन्शनचा अधिकार दिला आहे. सीमेवर प्रत्युत्तर देण्याची मोकळीकही दिली. सैन्याचा अपमान, देशाचे विभाजन हीच काँग्रेसची ओळख आहे. काँग्रेस सत्तेवर असेपर्यंत सैनिकांना कारवाईची मुभा नव्हती. यामुळे शत्रू हल्ला करुन निघून जायचा. सैनिकांना प्रत्युत्तर देण्याची अनुमतीच दिली जात नव्हती असा आरोप मोदींनी केला आहे.