बळीराजाला धास्ती ढगाळ वातावरणाची
शिवारात सुगीची कामे जोमाने, मजुरांची टंचाई : भात उत्पादनात निम्म्याहून अधिक घट
वार्ताहर / किणये
सध्या तालुक्यात सुगी हंगाम जोमाने सुरू आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणात गडद दिसून येत आहे. त्यामुळे या ढगाळ वातावरणाची धास्ती बळीराजाला लागली आहे. आता सुगी हंगाम साधायचा कसा, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
यंदा खरीप हंगामात पाऊस झाला नाही. यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला. काही शेत शिवारात शिल्लक असलेल्या भात पिकांची कापणी, त्याची बांधणी व मळणी आदी कामे सध्या तालुक्याच्या सर्रास भागात सुरू आहेत. मात्र ढगाळ वातावरण अधिक प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला पहावयास मिळत आहे.
ढगाळ वातावरणामुळे पावसाची रिमझिम केंव्हा होईल सांगता येत नाही. यामुळे शिवारातील मळणीची कामे आटोपून घेण्यासाठी बळीराजाची धडपड दिसून येत आहे.
अलीकडे तालुक्याच्या विविध भागांमध्ये औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून गावांच्या वेशीपर्यंत कारखाने उभारले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गही या कारखान्यांमध्ये कामासाठी जात आहेत. यामुळे शेत शिवारात मजुरांची टंचाई अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.
ऐन खरीप हंगामात पाऊस झाला नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटली. यामध्ये भाताची वाढ झाली नाही. तर काही ठिकाणी भात पोसवलेच नाही. त्यामुळे सुक्या चाऱ्याचा प्रश्न अधिक प्रमाणात निर्माण होणार आहे.
भाताच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे आता शेत शिवारात राबून काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही भात अथवा तांदूळ विकत घ्यावे लागणार आहे. भात पिकासह सर्रास पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाभावी नुकसान झाले आहे. तर सध्या सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.
बासमती, इंद्रायणी, सोना मसुरी, इंटान, भाग्यलक्ष्मी, मधुरा आदींसह विविध प्रकारची भातपिके घेण्यात आली आहेत.
ढगाळ वातावरणामुळे कापून ठेवलेल्या भाताची मळणी करण्यात येत आहे. तर हे भातही योग्यप्रकारे सुकून आले नाही. त्यामुळे हे पिंजर वाळण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे.
शेतमजुरांची टंचाई भासत असल्यामुळे बरेच शेतकरी आपापसात एकमेकांमध्ये मिलीभगत करून शिवारातील कामे करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे आज एखाद्या शेतकऱ्यांची मळणी करायची आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेतकऱ्याची मळणी. अशी एकमेकांची मदत घेऊन शेतकरी काम करताना दिसत आहेत.
ट्रॅक्टरच्या सहाय्याने मळणी करण्यासाठी एका तासाला सहाशे रुपये इतके भाडे देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी या भाड्याच्या दरामध्ये भागानुसार फरक आहे. तसेच एका माणसाला दिवसाला 220 ते तीनशे रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येत आहे. सुगी कामाचा हंगाम जोमाने सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता कायम आहे.