भारत-पाक सीमेनजीक जाणे टाळा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेने जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर स्वत:च्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. अमेरिकेने स्वत:च्या नागरिकांना ‘हिंसक अशांतते’च्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किलोमीटरच्या कक्षेत प्रवास न करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. अन्य युरोपीय देशांनी देखील स्वत:च्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते.
अमेरिकेच्या नागरिकांसाठी हा सल्ला पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जारी केला आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात 28 जणांना जीव गमवावा लागला असून सर्व मृत हे पर्यटक होते. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतरचा काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी हल्ले आणि हिंसक अशांततेची शक्यता आहे. या केंद्रशासित प्रदेशात प्रवास करू नका. या क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेवर संघर्ष होण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यातील पर्यटनस्थळ श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम येथेही जाणे टाळावे, असे अमेरिकेच्या विदेश विभागाकडून स्वत:च्या देशांच्या नागरिकांकरता जारी सल्ल्यात म्हटले गेले आहे.
सशस्त्र संघर्षाची भीती
अमेरिकेने स्वत:च्या नागरिकांना भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किलोमीटरच्या कक्षेत जाणे टाळण्यास सांगितले आहे. तेथे सशस्त्र संघर्ष होण्याची भीती असल्याचे म्हटले गेले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अमेरिका भारतासोबत असल्याचे सांगितले आहे. यातून भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलल्यास अमेरिकेचा विरोध होणार नसल्याचे मानले जात आहे.