बिजगर्णी येथे मुख्य जलवाहिनी फुटून पाणी वाया
ग्राम पंचायत याकडे लक्ष देणार का?
बेळगाव : बिजगर्णी गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्यातच पाईप फुटल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने या पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी बिजगर्णी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाजी चौक, जानेवाडी रोडवर असलेल्या मुख्य जलवाहिनीलाच गळती लागली आहे. या गळतीमुळे या परिसरात पाण्याचे मोठे डबके तयार झाले आहे. याचबरोबर चिखलही होत आहे. त्यामुळे ये-जा करणेही अवघड होत आहे. सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यातच ही पाईप फुटली आहे. ग्राम पंचायतीने तातडीने लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करणे महत्त्वाचे होते. याचबरोबर वॉर्ड क्र. 2 मधील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीसमोरही पाणी साचून राहत आहे. केंद्र सरकारची ही योजना अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून पाईपलाईन घालण्यात आली होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. तेव्हा ग्राम पंचायत याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुरुस्ती लवकरच करू!
गावातील अनेक गटारींचे काम चालू केले आहे. त्यामुळे जेसीबीच्या सहायाने खोदाई करतेवेळी ही पाईप फुटली आहे. लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल.
-संतोष (आप्पू) कांबळे, ग्रा. पं. सदस्य