संभाव्य पूरस्थिती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून साहाय्यवाणी
जिल्ह्यामध्ये 427 काळजी केंद्रे उभारण्याचे नियोजन
बेळगाव : जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकाराच्या बैठकीमध्ये संभाव्य पूरस्थिती निवारण करण्यासाठी विविध खात्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 24 तास मदत सेवा देण्यासाठी तालुकास्तरावर हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये 427 काळजी केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वखबरदारी म्हणून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम. पं. ला एक त्याप्रमाणे तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम. पं. व्याप्तीमध्ये टास्क फोर्स समितीची रचना करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या काळात जिल्हा आणि तालुका आरोग्य रक्षक पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
पूरस्थिती दरम्यान पुराच्या विळख्यात सापडलेल्dया नागरिकांना आसरा देण्यासाठी 427 काळजी केंद्रे उभारण्यात आली आहेत. 35 बोटींची सुविधा केली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या प्रत्येक 10 वॉर्डांसाठी किमान 10 जणांच्या पूरस्थिती निवारण पथकाची रचना केली आहे. हे पथक 24 तास कार्यरत राहणार आहे. राज्य आपत्ती निवारण पथक सी कंपनी अशा एकूण 45 जणांचे पथक कार्यरत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण एनडीआरएफच्या 29 सदस्यांचे पथक सज्ज आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच महानगरपालिकेमध्ये तत्काळ मदत केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका केंद्रावर तहसीलदारांच्या नेतृत्वामध्ये मदत केंद्रांची उभारणी केली आहे. त्या संदर्भातील मदत क्रमांकही जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
तहसीलदार कार्यालयातील मदत संपर्क केंद्र
अथणी तहसीलदार-7349312928, बैलहोंगल तहसीलदार 08288233352, बेळगाव तहसीलदार-08312407286, चिकोडी 08338272131, गोकाक 083332225073, हुक्केरी 08333265036, खानापूर 08336222225, रामदुर्ग 08335242162, रायबाग 8867519106, सौंदत्ती 08330222223, कित्तूर 08288286106, निपाणी 08338220030, कागवाड 08339264555, मुडलगी 8867439539.