For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृत्रिम बुद्धिमत्ता: आव्हानपर उपयुक्तता

06:43 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
कृत्रिम बुद्धिमत्ता  आव्हानपर उपयुक्तता
Advertisement

कृत्रिम बुद्धिमत्ता,

Advertisement

त्याचे स्वरुप, उपयोग व त्यानिमित्ताने पुढे आलेली आव्हाने हे मुद्दे सध्या सर्वदूर चर्चेचे झाले आहेत. असे होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा संवादापासून उद्योग-व्यवसाय, संदर्भ पडताळणी, भाषिक रचना इ. विविध संदर्भात होणारे व होऊ घातलेले उपयोग व त्याचे विविधांगी स्वरुपात होणारे वा होऊ शकणारे परिणाम व फायदे. हे दोन्ही मुद्दे आपापल्या परीने महत्त्वाचे आहेत व होऊ शकतात याचे प्रत्यंतरसुद्धा येऊ लागले आहे.

सकृतदर्शनी असे दिसून येते की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उद्योग-व्यवसाय क्षेत्रात केल्यास त्याचा थेट व मोठा परिणाम मुख्यत: कार्यालयीन कामकाजांशी संबंधित वा आधारित रोजगारांवर होऊ शकेल. याची चुणूक आता संबंधितांना लागली असून विशेषत: कर्मचारी स्तरावर काम करणाऱ्या पांढरपेशा वर्गातून या संदर्भात काळजीचा स्वर उमटू लागला आहे. त्यातही संगणक क्षेत्र व प्रक्रियेवर आधारीत होणार अशी आधारभीती आत्ताच व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संगणक सेवा, प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपनीने एकाच फतव्यात केलेली 12000 कर्मचाऱ्यांच्या कपातीची केलेली घोषणा. अशी स्थिती या क्षेत्रात मोठ्या घडामोडी वा उलथापालथीचा टप्पा ठरलेल्या ‘वायटू-के’ पासून नजिकच्या कोरोना काळात पण आली नव्हती. या दरम्यान देशांतर्गत संगणक सेवा उद्योगांमध्ये विविध कारणांनी चढ-उतार होतच राहिले. यात टीसीएससारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरी संख्येच्या संदर्भातील धोरणाचे मात्र व्यापक स्वरुपात पडसाद उमटले आहेत.

या संदर्भ आणि पार्श्वभूमीचा व्यावहारिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून पडताळा घेणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून होणारे मोठे व महत्त्वाचे बदल म्हणजे त्यामुळे मूलत: विविध व महत्त्वाचे कामकाज व त्यांचे स्वरुप याची फेररचना होत आहे अथवा होऊ घातली आहे. यातून व्यक्तीगत स्तरावरील कामकाजात अधिक स्पष्टता वा नेमकेपणा येऊ शकते. या नव्या प्रक्रियापद्धतीला अद्ययावत तंत्रज्ञानाची मोठी साथ लाभल्याने परंपरागत कामकाज पद्धतीच्या ऐवजी अद्ययावततेवर आधारीत अशा वेगवान व आर्थिकदृष्ट्या अधिक परिणामकारक व लाभदायी कामकाज प्रक्रियेवर यापुढे व्यवस्थापनांचा स्वाभाविक भर राहणार आहे. याचाच एक अपरिहार्य परिणाम कर्मचारी आणि त्यांच्या संख्येवर दुहेरी स्वरुपात होऊ शकतो. एक म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे कामकाज व ते करण्याच्या पद्धतीचा मुळातून व तपशीलवार असा आढावा घेतल्याने व्यवसाय-व्यवस्थापनाची नवी मांडणी व त्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगत वापरामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येची फेररचना अपरिहार्य असल्याने होणारी कर्मचारी कपात. याचाच दुसरा पैलु म्हणजे नजिकच्या काळात व्यवसाय प्रक्रिया स्वरुपात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या कंपन्या मुळातच आपल्या व्यावसायिक गरजा व प्राधान्यांनुसार कर्मचाऱ्यांची निवड नेमणूक करणार असल्याने नव्या उमेदवारांच्या निवडीवर स्वाभाविकपणे मर्यादा येतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यावसायिक वापराच्या संदर्भात जागतिक संदर्भात पण वेगळी स्थिती नाही. ‘वर्क इकॉनॉमिक फोरम’ च्या 2025 साठीच्या संदर्भात नुकत्याच प्रकाशित अहवालामध्ये सद्यस्थितीतील रोजगार स्थिती या संदर्भात विशेष तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. या अभ्यासपूर्ण अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमतेसह विकसित तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावरील उपलब्ध वा होऊ घातलेल्या रोजगार संधींमध्ये सुमारे 25 टक्केची घट अपेक्षित राहील. मात्र याच अहवालातील एक महत्त्वाची व आशादायी बाब म्हणजे एकूण उद्योग-व्यवसाय वाढीमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींमुळे रोजगार कपातीची प्रत्यक्ष टक्केवारी सुमारे 8 टक्के असेल. ही अपेक्षित टक्केवारी आजच्या संदर्भात निश्चितच आशादायी ठरते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब आणि वापरामुळे साचिव वा ठराविक पद्धतीच्या कामकाज आणि नोकरी रोजगारांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे. या नव्या व्यावसायिक बदलांच्या पार्श्वभूमीवर पण आपल्या व्यवसाय-व्यवस्थापन पद्धती आणि प्रक्रियांचा अभ्यासपूर्ण फेरविचार करणे कंपन्या आणि कर्मचारी या उभयतांसाठी आवश्यक ठरते. यावरच नजिकच्या भविष्यातील प्रश्न आणि त्यांची सोडवणूक अवलंबून असेल.

कर्मचारी निवड संदर्भात विविध स्तरांवर काम करणाऱ्या एनएलबी सर्व्हिसेस या कंपनीचे मुख्याधिकारी सचिन अलग यांच्यानुसार या वर्षीच्या सुरूवातीपासून त्यांच्याकडे येणाऱ्या कर्मचारी-अधिकारी पदांसाठीच्या संदर्भात विशेष बदल दिसून येतात. त्यांच्यानुसार सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या पहिल्याच टप्प्यात ग्राहक संपर्क-सेवा, संवाद पद्धती, माहिती संकलन व संग्रह, सुलभ संदर्भ, बिलांची आकारणी नित्याचा पत्रव्यवहार व पाठपुरावा व नेहमीच्या कामकाजी मुद्यांचे स्मरण इ. क्षेत्रातील रोजगारांमध्ये लक्षणीय स्वरुपाची घट दिसून आली.

या संदर्भात भारतीय व्यवस्थापन रचना व पद्धतीचे परंपरागत वैशिष्ट्या म्हणजे आपल्याकडे नित्याचे व एकसारखे वा समान स्वरुपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. या स्थिती-परिस्थितीचा फारसा गांभीर्याने विचार कधी झालाच नाही. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या कारणाने विविध उद्योग-व्यवसाय क्षेत्रात त्यावर गांभीर्याने विचार करणे अपरिहार्य ठरते.

दरम्यान सुमारे 30 वर्षांपूर्वी उद्योग-व्यवसायातील विविध कंपन्यांच्या समान स्वरुपाच्या वा सामाजिक कामे करणाऱ्या सेवा आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्र व एकीकृत सेवा पुरविण्याच्या व्यापक उद्देशाने बीपीओ म्हणजेच Business Process outsourcing  आणि  Kpo म्हणजे  Knowledge Process Outsourcing  या नव्या व्यवस्थापन पद्धतींचा विकास आणि यशस्वी अवलंब करण्यात आला. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयामुळे या त्यावेळच्या यशस्वी पद्धतीपुढे पण अस्तित्त्वाचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कंपनी असो वा बीपीओ-केपीओ ज्या रोजगारांवर सध्या संकटसदृष वा आव्हानपर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजी क्षेत्रांचा समावेश करता येईल.

वित्त आणि लेखा : विक्री-वसुलीशी संबंधित व्यवहार आणि हिशेब, आर्थिक व्यवहारांचे संकलन, वार्षिक अर्थसंकल्पाची मांडणी व पडताळणी इ.

आर्थिक व विमा क्षेत्र : विम्याशी संबंधित विषय आणि दाव्यांचा पडताळा घेणे, विमा विषयक पाठपुरावा आणि शंकानिरसन, संबंधितांशी मार्गदर्शनपर संवाद, नूतनीकरण व मार्गदर्शन इ.

मार्केटिंग व्यवहार : व्यावसायिक संवाद, पाठपुरावा, शंका निरसन, जाहीरातीचा मजकूर, संभाषण-सादरीकरण इ.

कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन : कायदेविषयक तरतुदी व त्यांची अंमलबजावणी, वेळेत नूतनीकरण, उद्योग-व्यवसायाशी निगडीत कर-व्यवहार व तत्सम पद्धती, कायदेविषयक कागदपत्रांची मांडणी इ.

बीपीओ-केपीओ-ग्राहक सेवा क्षेत्र : आवाजावर आधारीत ध्वनिमुद्रित व्यावसायिक प्रतिसाद, ग्राहकांचे शंकानिरसन, नित्याच्या मुद्यांवर मार्गदर्शन, प्रतिसाद प्राप्त करणे, महत्त्वाचे व्यावसायिक संदेशवहन इत्यादी.

यावरुन एक बाब स्पष्ट होते की, सध्या आणि यानंतर उद्योग-व्यवसाय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत्या प्रमाणावर व लवकरच अपरिहार्य ठरणार आहे. या  मोठ्या व्यावसायिक बदलाचा परिणाम उद्योगांतर्गत रोजगार आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येवर निश्चितपणे होणार आहे.

यावर उपाययोजना कंपनी-कर्मचारी या उद्योगातील महत्त्वपूर्ण घटकांच्या सहभागातूनच शक्य होणार आहे. त्यादृष्टिने कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदललेल्या अथवा बदलणाऱ्या व्यावसायिक परिस्थितीवर मात करण्यासाठी बदलत्या व्यावसायिक गरजांनुरुप कर्मचाऱ्यांचे फेर प्रशिक्षण, प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण-प्रशिक्षण व त्यांचा वापर, कर्मचाऱ्यांचा अनुभव व प्रशिक्षणावर आधारीत व्यावसायिक गरजांनुरुप फेर-रचना व नेमणूक करणे, व्यावसायिक प्रक्रियेतील मानवीय व्यवहारांचे प्रमाण कमी होईल, याची तयारी करणे व मुख्य म्हणजे वाढत्या व मोठ्या बदलांच्या अंमलबजावणीसाठी बदलांच्या धोरणात्मक अंमलबजावणीला कंपनी-कर्मचारी या उभयतांनी सामोरे जाणे यावर व्यावसायिक यशाची निश्चिती होणार आहे.

-दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.