शहर-परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन
काही ठिकाणी पावसाची हुलकावणीच : बेळगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बहुतांश गावांमध्ये दमदार पाऊस
बेळगाव : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. बुधवारी सकाळपासूनच घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या. त्यामुळे पाऊस होईल, अशी अपेक्षा साऱ्यांचीच होती. सायंकाळी 4.30 च्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. शहरात मात्र काहीवेळच पावसाचा शिडकावा झाला. संतिबस्तवाड, मच्छे, पिरनवाडी परिसरासह तालुक्याच्या उत्तर भागामधील गावांमध्ये दमदार पाऊस कोसळला आहे. उष्म्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही होत होती. वाढलेल्या उष्म्यामुळे थंडपेयांचा आधार घ्यावा लागत होता. याचबरोबर कार्यालयातही एसी किंवा फॅनचा आधार घेऊनच गारवा घ्यावा लागला. मागील काही दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली होती. पारा 39 अंशांवर पोहोचला होता. दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा साऱ्यांनीच व्यक्त केली होती. बुधवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले. शहरात पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्यामुळे हवेत गारव्याऐवजी उष्माच निर्माण झाल्याचे दिसून आले.
जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. मात्र म्हणावा तसा जोर पावसाला नव्हता. परिणामी 5 वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात पाऊस झाला. यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेत्यांना आडोसा शोधावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. मात्र काहीवेळच पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा उष्म्यामध्ये वाढ झाली होती. पाण्याची टंचाई असल्यामुळे आता वळिवावरच साऱ्यांची भिस्त राहणार आहे. जोरदार वळीव पाऊस कोसळला तर काही प्रमाणात पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वळिवाच्या पावसाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. गेल्या 10 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. दिवसभर तसेच रात्रभरही उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे दमदार पावसाची साऱ्यांचीच अपेक्षा होती. मात्र पहिल्याच वळिवाने अपेक्षा भंग केली आहे. तालुक्याच्या उत्तर भागामध्ये असलेल्या कडोली, अगसगे परिसरात जोरदार पाऊस झाला.