भारतीय क्रिकेट संघाचे लंकेत आगमन
वृत्तसंस्था/पल्लीकेली
नवे प्रशिक्षक गौतम गंभीर तसेच नवा कर्णधार सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंकेत मंगळवारी आगमन झाले. लंकन क्रिकेट मंडळातर्फे भारतीय संघातील विमान तळवार जोरदार स्वागत करण्यात आले.
अलिकडे भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने लंकेत होणाऱ्या आगामी मालिकेसाठी भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी लंकेच्या शौकिनांनी विमान तळावर अधिक गर्दी केली होती. भारत आणि लंका यांच्यात टी-20 चे तीन सामने तसेच 3 वनडे सामने खेळविले जाणार आहेत. भारतीय संघाचे कोलंबो मार्गे पल्लीकेलीत आगमन झाले. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ 27 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर उभय संघातील तीन वनडे सामने 2, 4, 7 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक युवा नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी-20 प्रकारातून निवृत्त झाल्यानंतर आता या दौऱ्यात पहिल्यांदाच टी-20 प्रकारात भारताचे नवोदित खेळाडू दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शुभमन गिलकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये संजीव सॅमसन, हार्दिंक पंड्या, मोहम्मद सिराज आणि अर्षदीप सिंग यांचाही समावेश आहे.