होलसेल फळ बाजारात द्राक्षे, संत्री, कलिंगडची आवक
बेळगाव : उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने फळांना मागणी वाढू लागली आहे. गांधीनगर येथील होलसेल फळ बाजारात कलिंगड, द्राक्षे आणि संत्र्यांची आवक वाढली आहे. वाढत्या उष्म्यामुळे या फळांना पसंती दिली जात आहे. होलसेल फळ बाजारात हळूहळू फळांची आवक होऊ लागली आहे. कलिंगड 10 ते 15 रुपये किलो, द्राक्षे प्रति 10 किलो 200 ते 300 रुपये, काळी द्राक्षे प्रति 10 किलो 400 ते 500 रुपये, संत्री 20 किलोचा ट्रे 500 ते 800 रुपये असा दर आहे. हिवाळ्यातील थंडी गायब होऊन उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे थंड पेये आणि फळांना मागणी वाढू लागली आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि इतर ठिकाणांहून फळे दाखल होऊ लागली आहेत. अथणी, कागवाड आणि चिकोडी भागातून द्राक्षे आणि इतर ठिकाणांहून कलिंगड व संत्री येत आहेत. सध्याच्या परिस्थितीत फळांचे दर आवाक्यात असले तरी येत्या दिवसांत ते वाढण्याची शक्यता आहे. इतर फळांच्या तुलनेत कलिंगड, संत्री, मोसंबी आणि द्राक्षांची आवक अधिक आहे. त्याबरोबरच फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यांच्या पेट्याही दाखल होऊ लागल्या आहेत. मात्र, अद्याप म्हणावा तसा आंबा बाजारात दिसत नाही.