विदेशातही होतो पकडौआ विवाह
अत्यंत अजब आहे येथील प्रथा
बिहारमध्ये काही वर्षांपूर्वी पकडौआ विवाह सामान्य प्रकार होता, पकडौआ विवाहाचा अर्थ कुठलाही युवक किंवा युवतीला बळजबरीने पकडून त्यांचा विवाह लावून देणे असा आहे. बिहारमध्ये आता हा प्रकार हळूहळू कमी होत आहे. परंतु एका देशात आजही युवतींचे अपहरण करत त्यांचा बळजबरीने विवाह लावून दिला जात आहे. या देशात ब्राइड किडनॅपिंगच्या विरोधात कायदा आहे, तरीही तेथे हा प्रकार उघडपणे चालतो.
किर्गिस्तानमधील ग्रामीण भागांमध्ये फोर्स्ड मॅरेज सामान्य बाब आहे. या देशातील 60 टक्के लोकसंख्येचा विवाह अशाचप्रकारे झालेला आहे. तेथे या प्रथेचे नाव बै अल काचु आहे. अल काचुचा अर्थ पकडा आणि पळा असा आहे. या प्रथेत समूह निर्माण करत युवतीचा शोध घेतला जातो आणि पसंत पडल्यास युवत तिचे अपहरण करतात. प्रत्यक्षात युवक विवाहयोग्य वयाचा झाल्यास परिवाराचे लोक स्वत: त्याला या प्रथेसाठी प्रवृत्त करतात.
विवाहास नकार दिल्यास...
यानंतर युवतीचा शोध सुरू केला जातो. यादरम्यान युवती तंदुरुस्त आणि सुंदर असावी असे पाहिले जाते. सर्वसाधारणपणे गरीब घर आणि कमी वयाच्या युवती या प्रथेच्या शिकार ठरतात. युवक स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत मिळून तिचे अपहरण करतात आणि मग तिला युवकाच्या घरी नेत छळ सुरू केला जातो. प्रथम युवकाचे कुटुंबीय युवतीशी चर्चा करून तिचा होकार मिळविण्याचा प्रयत्न करतात. वयात अधिक अंतर असल्यास युवती नकार देत असतात. अशा स्थितीत युवकाचे कुटुंबीय तिचा छळ करतात. अनेक घटनांमध्ये तर बलात्काराचे प्रकारही घडले आहेत.
अनेक प्रकरणांमध्ये हत्या
हा प्रकार घडत असतानाच युवतीचे कुटुंबीय युवकाच्या घरी पोहोचतात. सर्वसाधारणपणे युवतीला होकारच द्यावा लागतो, या देशात अपहरण झालेल्या युवतीला तिचे कुटुंबीय पुन्हा स्वीकारण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यानंतर युवतीला पकडून तिच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचा स्कार्फ बांधला जातो, ज्याचा अर्थ ती विवाहासाठी तयार झाली असा होतो. परंतु तरीही युवतीने होकार न दिल्यास अनेक प्रकरणांमध्ये तिची हत्या करण्यात येत असल्याच्या घटना घडल्या आहेत. 2018 मध्ये किर्गिस्तानमध्ये अशाच प्रकारचे प्रकरण घडल्यावर तेथे उग्र निदर्शने झाली होती.