जागावाटपावरून महाआघाडीत वाद
बिहारमध्ये डाव्या पक्षांनी केली मोठी मागणी : संजद 17 जागांवर ठाम
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीत जागावाटपावरून जोरदार चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष संजद अद्याप स्वत:च्या 17 जागांच्या मागणीवर ठाम आहे. तर याप्रकरणी डाव्या पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बिहारमध्ये 17 लोकसभा मतदारसंघांवर संजदचा कुठलाच अधिकार नसल्याचे डाव्या पक्षांनी म्हटले आहे. जागावाटपाचा निर्णय मोठे नेते घेणार आहेत, प्रसारमाध्यमांना माहिती पुरवून जागांचे वाटप होत नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सारवासारव केली आहे.
संजदला 17 जागांवर दावा सांगता येणार नाही. काराकाट, आरा, पाटलिपुत्र आणि जहानाबादमध्ये आमची स्थिती मजबूत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हे मतदारसंघ आमच्या वाट्याला यावेत अशी आमची मागणी असल्याचे डाव्या पक्षांचे नेते रामबली सिंह यादव यांनी म्हटले आहे. जहानाबाद आणि काराकाट येथे सध्या संजदचा खासदार आहे. काराकाट येथे संजदचे महाबली सिंह हे खासदार आहेत. तर संजदचे चंद्रेश्वर चंद्रवंशी हे जहानाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
डाव्या पक्षांच्या मागणीवर संजदने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही कुठल्याही स्थितीत स्वत:कडे असलेले मतदारसंघ सोडणार नाही. संजदकडून 17 जागांची मागणी केली जात असून ती योग्य आहे. या 17 जागांवर मागील लोकसभा निवडणुकीत संजदने विजय मिळविला होता. आम्ही या 17 मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार यात कुठलाच संशय नसल्याचे उद्गार संजदचे वरिष्ठ नेते भीष्म सहनी यांनी काढले आहेत.