For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील तीन नव्या जेटींना मंजुरी

12:42 PM Sep 18, 2025 IST | Radhika Patil
रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील तीन नव्या जेटींना मंजुरी
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

मत्स्य व्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार नीतेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्गमधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेडविषयीही मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटींमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर येथे नव्या जेटी उभारण्यात येणार आहेत. कोकणात मासेमारीबरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत.

Advertisement

  • प्रवास खर्च, वेळ दोन्हींची बचत होणार

या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटन वृद्धी होणार असून पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे. यातूनच स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जावून यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.

  • प्रवासी, मालाची वाहतूक होणार सोयीस्कर

मंत्री नीतेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसायाला त्यांनी जल पर्यटनाची जोड दिली आहे. किनारपट्टीवर सोयीसुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी व पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्वाच्या असून या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कर करता येणार आहे.

Advertisement
Tags :

.