महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रस्थापित विरोधी भावना, बंडखोरी यांची काँग्रेस झळ शक्य

05:31 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छत्तीसगडमध्ये प्रथम टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला पार पडले आहे. ते 20 मतदारसंघांमध्ये होते. आता ऊर्वरित 70 मतदारसंघांमध्ये ते येत्या 17 नोव्हेंबरला होणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या सरगुजा विभागात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. तथापि, यावेळी प्रस्थापितविरोधी भावना, लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता आणि बंडखोरी यांची झळ काँग्रेसला पोहचू शकेल, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. या भागात यावेळी काँग्रेसविरोधी कल दिसून येत आहे, असे या भागात तळ ठोकलेल्या काही पत्रकारांचे मत आहे.

Advertisement

या भागात विधानसभेच्या 14 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत सर्व जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. राज्यात काँग्रेसला त्यावेळी जे अभूतपूर्व यश मिळाले होते, त्यात सरगुजा क्षेत्राचा वाटा मोठा होता. तथापि, यावेळी काँग्रेसला मागच्या वेळेइतके यश मिळेल का ? याविषयी त्या पक्षातूनही साशंकता व्यक्त होत आहे.

Advertisement

सहा जिल्ह्यांचा विभाग

सरगुजा प्रशासकीय विभागात जशपूर, कोरेया, सूरजपूर, सरगुजा, बलरामपूर आणि नव्याने निर्माण करण्यात आलेला महेंद्रगड-भरतपूर असे सहा जिल्हे आहेत. या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 14 जागा आहेत. या भागात वनवासी समुदायांची संख्या मोठी असल्याने 14 पैकी 9 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. हा विभाग राज्याच्या उत्तर भागात स्थित आहे.

पूर्वी भाजपचा प्रभाव

या भागावर पूर्वी भाजपचा प्रभाव होता. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 14 पैकी 9 जागा, तर काँग्रेसने 5 जागा जिंकल्या होत्या. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी सात जागा मिळाल्या होत्या. तथापि, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकून एक विक्रम प्रस्थापित केला होता. राज्याची निर्मिती 2000 मध्ये झाल्यापासून 2018 पर्यंत एकदाही कोणत्याही पक्षाने सर्वच्या सर्व जागा या भागात जिंकल्या नव्हत्या. मात्र, गेल्यावेळी काँग्रेसने हा पराक्रम करुन दाखविला होता.

यावेळी बंडखोरीची समस्या

यावेळी काँग्रेसने आपल्या चार आमदारांना तिकिट दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढल्याचे बोलले जाते. तथापि, काँग्रेस पुन्हा आपल्या विक्रमाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास त्या पक्षाचा आहे.

राजघराण्यांचा प्रभाव

या विभागावर राजघराण्यांचा प्रभाव पूर्वापारपासून आहे. सिंग देव हे राजघराण्यातील ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मात्र, त्यांचे ब्रिशस्पतसिंग या तिकिट नाकारलेल्या आमदाराशी मतभेद आहेत. सिंग देव यांच्यामुळेच आपले तिकिट कापल गेले अशी ब्रिशस्पतसिंग यांची भावना आहे. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. तसेच इतर बंडाखोरांनाही ते साहाय्य करीत आहेत, असे बोलले जाते. तथापि, सिंग देव यांनी आरोप नाकारले आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article