आरजेडीला आणखी एक झटका
वृत्तसंस्था/ पाटणा
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगत असतानाच एकापाठोपाठ एक मोठे नेते राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) सोडचिठ्ठी देत आहेत. अश्फाक करीम यांच्यानंतर शनिवारी वृषिन पटेल यांनी राजदचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी पक्षनेतृत्त्वावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राजदला समर्पित कार्यकर्त्यांची गरज नाही, असे त्यांनी राजीनामापत्रात लिहिले आहे. राजदचा सामाजिक न्याय आणि जातीय सलोख्यावर विश्वास नाही. जड अंत:करणाने मी राजदच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे ते म्हणाले.
वृषिन पटेल हे बिहारच्या ज्येष्ठ राजकारण्यांपैकी एक असून ते कुर्मी जातीच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. ते बिहार सरकारमध्ये मंत्री राहिले असून यापूर्वी खासदारही राहिले आहेत. राष्ट्रीय जनता दलाला समर्पित कार्यकर्त्यांची गरज नाही हे त्यांच्या लक्षात आल्याचे त्यांनी राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंग यांना पत्र लिहून म्हटले आहे. राजद एकल खिडकी प्रणाली चालवत नाही, लोकशाहीबाबत ठोस भूमिका नाही. जातीय सलोखा आणि सामाजिक न्यायावरही पक्षाचा विश्वास नव्हता. अशास्थितीत जड अंत:करणाने आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वृषिन पटेल यांच्या राजीनाम्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. त्यांना वैशाली मतदारसंघातून तिकीट नाकारून पक्षाने मुन्ना शुक्ला यांना उमेदवारी दिली. यापूर्वी वृषिन पटेल वैशालीमधून खासदार राहिले आहेत.