कित्तूर मतदारसंघातून अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देणार
आमदार बाबासाहेब पाटील : कित्तूर तालुक्यात झंझावाती प्रचारदौरा
खानापूर : कित्तूर तालुक्यातील मतदारांनी आजपर्यंत भाजपला भरपूर सहकार्य केले. मात्र, भाजपने नेहमीच कित्तूर तालुकावासियांची निराशा केली. तीस वर्षात भाजप खासदारांनी कित्तूरसाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसच कित्तूरचा कायापालट करणार आहे. यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देऊन भाजपला अद्दल घडवा, असे आवाहन कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कित्तूर तालुक्यातील अंजली निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यावेळी केले. कित्तूर तालुक्यात गेले दोन दिवस अंजली निंबाळकर यांचा झंझावाती प्रचार सुरू असून मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर तालुक्यातील अनेक गावांतून प्रचारात कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर म्हणाल्या, कित्तूरचा इतिहास लढवय्याचा आहे. राणी चन्नम्मांनी आपल्या लढवय्या प्रवृत्तीने इतिहास निर्माण केला आहे. यासाठी कित्तूर मतदारसंघातील जनतेने काँग्रेसच्या पाठिशी राहून खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला तालुक्यातून हद्दपार करून काँग्रेसला मताधिक्य द्यावे आणि तालुक्याचा कायापालट करण्याची संधी द्यावी. कित्तूर तालुक्यातील हणबरहट्टी, वन्नूर, होसकादरवळ्ळी, निच्चनकी, देगाव, कलभावी, खोदानपूर, हुन्शीकट्टी, तिगडोळीसह अनेक गावात झंझावाती प्रचार करण्यात आला. यावेळी मतदारांनी विजयी करण्याचा निर्धार केला असून उपस्थित मतदारांनी काँग्रेसला हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला.