उचगाव गणपत गल्ली-लक्ष्मी गल्लीत पेव्हर्स बसविण्याचे काम रखडल्याने संताप
उचगाव : उचगाव गावामध्ये जलजीवन या केंद्राच्या मुबलक आणि 24 तास पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करून जवळपास दोन वर्षे होत आली. यामध्ये गणपत गल्ली आणि लक्ष्मी गल्ली ही गावातील ये-जा करणारे महत्त्वाचे मार्ग असून या मार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा चरी मारून पाईपलाईन घालण्यात आली. चरी बुजविण्यात आल्या. मात्र वरती काँक्रीट अथवा पेव्हर्स बसविण्याचे काम अद्याप रखडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेअंतर्गत गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा चरी मारून यामधून पाईप घालून घरोघरी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या घरोघरी गावात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र उर्वरित कामांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दोन पावसाळे संपून पुन्हा उन्हाळा सुरू झाला तरी अद्याप काम रखडलेलेच आहे. याकडे ग्रामपंचायतीनेही लक्ष देणे गरजेचे आहे.
तरी गणपत गल्ली आणि लक्ष्मी गल्लीतील रस्त्याच्या दुतर्फा खणलेल्या चरी भरून दोन वर्षे उलटली तरी अद्याप या चरीवरती काँक्रिटीकरण अथवा पेव्हर्स बसवण्याचे काम झालेले नाही. परिणामी या चरीवरती धूळ आणि पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे नागरिकांना याचा सामना करण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाळा संपून आता उन्हाळ्याला प्रारंभ झाला तरी या चरीच्या वरती टाकलेल्या मातीचा चिखल झाला आहे. तरी सदर ठेकेदाराने तातडीने या गल्लीमधील काँक्रिटीकरण अथवा पेव्हर्स बसवण्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा याचा जाब संबंधित खात्याला विचारला जाईल, असा नागरिकांनी इशारा दिला आहे.