बास्केट ब्रीजला जोडूनच तावडे हॉटेल-शिवाजी पूल उड्डाणपूल
कोल्हापूर :
शहरातील वाहतुकीची कोंडी कायमची सोडविण्यासाठी बास्केट ब्रिजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल उभारावा, अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या. टेंबलाईवाडी येथील सध्याचा उड्डाणपूल पाडून शिवाजी विद्यापीठ चौकापर्यंत नवीन विस्तारित उड्डाणपूल करावा, असाही पर्याय यावेळी सूचविण्यात आला.
सातारा-कागल हायवे एनएच 48 (जुना एनएच 4) रोडवरील उड्डाण पूल, सातारा-कागल महामार्गाचे काम, सांगली फाटा ते उचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचा डीपीआर तसेच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाण पूल यांचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण झाले. यावेळी ते बोलत होते. वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर (दूरदृश्यप्रणालीद्वारे), राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू छत्रपती, आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थित होती.
बास्केट ब्रिजवरून कोल्हापूर शहरात थेट प्रवेश मिळणार असल्यामुळे तावडे हॉटेल येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. या बास्केट ब्रिजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलाची उभारणी करावी, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्यात येणार असून यासाठीचा तांत्रिक आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला.
या प्रस्तावित उड्डाण पुलाच्या कामासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड महापालिका प्रशासनाने करावी त्या कंपनीचे मानधन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिले जाईल असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. प्रस्तावित उड्डाण पुलामध्ये बाधित होणाऱ्या सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यासंदर्भात सल्लागार नेमण्यासाठी वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. संबंधित सल्लागाराची तातडीने नेमणूक करून अहवाल सादर करावा अशा सूचना आमदार महाडिक यांनी केल्या.
कोल्हापूर जिह्यातील राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपुलांशी संबंधित डीपीआरचे सादरीकरण संजय कदम यांनी केले. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते.
- टेंबलाईवाडी येथे विस्तरित उड्डाणपूल
टेंबलाईवाडी चौकातील वाहतुक कोंडी कमी होण्यासाठी टेंबलाईवाडी उड्डाणपूल पाडून विस्तारित उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात पाहणी करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मनपा आधिकाऱ्यांना दिल्या. हॉटेल सयाजीच्या दारातून सुरू होणारा हा उड्डाणपूल शिवाजी विद्यापीठ चौकापर्यंत न्यावा असे मत महाडिक यांनी व्यक्त केले. यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संरक्षण विभागाच्या परवानगीचा मुद्दा मांडला. या विषयावर 10 जून रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिले.
- उड्डाणपूलाच्या कामातच परिख पुलाचा प्रश्न निकाला काढा
परिख पूल हा शहरातील प्रमुख प्रश्न बनला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तावडे हॉटेल चौक ते शिवाजी पूलाच्या उड्डाणपूलाला मध्यवर्ती बस स्थानकापासून रेल्वे ओव्हर ब्रिज करून पाच बंगला परिसराशी जोडण्यात यावे, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. आमदार अमल महाडिक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हा मार्ग येत नसला तरी खास बाब म्हणून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊ असे सांगितले.
- करवीर पंचायतीला वळसा घालून होणार उड्डाणपूल
शहरात प्रवेश केल्यानंतर मार्केट यार्ड-कावळा नाका-मध्यवर्ती बस स्थानक-दसरा चौक अशा मार्गाने जाणाऱ्या या उड्डाणपुलाला सीपीआर चौकात वळवण्यात येणार आहे. करवीर पंचायत समितीला वळसा घालून पंचगंगा स्मशानभूमीच्या बाजूने शिवाजी पुलाकडे रत्नागिरी राज्य मार्गाला तसेच पंचगंगा नदी घाटाच्या बाजूने लक्षतीर्थ वसाहत मार्गे गगनबावडा राज्य मार्गाला हा उड्डाणपूल जोडण्यात येणार आहे.