अमृतमहोत्सवी सोहळा
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनाचे यंदाचे खास वैशिष्ट्या म्हणजे आपण भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे. एखादे राज्य, एखादे राष्ट्र हे आपल्या तत्त्वांवर, आपल्या नीतीवर आणि जनतेच्या सहकार्यानेच भक्कम पायावर उभे राहत असते. जगातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आणि भौगोलिक असो वा लोकशाही तत्त्व प्रणालीच्या माध्यमातून भारत हे सर्वार्थाने मोठे राष्ट्र आहे. हा देश नेहमीच लोकशाही प्रणालीतून मार्गक्रमण करीत आलेला आहे. या देशावर मोघलांनी राज्य केले. नंतर 150 वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले आणि देशातील जनतेचा वाढता उठाव आणि एकंदरीतच ब्रिटिश साम्राज्याचा इतर राष्ट्रात होत गेलेला पराभव यातून ब्रिटिशांना भारतातून पळ काढणे हे त्यांच्या हिताचे वाटले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय तिरंगा फडकला आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. हंगामी सरकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. मात्र भारताला खऱ्या अर्थाने घटनेने स्वातंत्र्य प्राप्त झालेला तो दिवस म्हणजेच 26 जानेवारी 1950. आपण त्याला गणराज्य दिवसही संबोधतो. आपल्या देशाला फार मोठा इतिहास आणि फार मोठ्या परंपराही आहेत. विविध भाषा, विविध संस्कृती, विभिन्न विचार आहेत. तरीही संपूर्ण देशाला एका तत्त्वाने बांधून ठेवले व ते म्हणजे भारतीय राज्यघटना. आपल्या भारतीय संविधानाची सुरवातच ‘sंा tप जदज्त द ग्ह्ग्a’ म्हणजेच ‘आम्ही भारतीय’ येथून सुरू होते. 1946च्या कॅबिनेट मिशन प्लानद्वारे भारतीय संविधान सभेने डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन केली होती. संविधान स्थापनेसाठी एकूण 22 समित्या स्थापन केल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान मसुदा तयार करून 1948 मधील फेब्रुवारीमध्ये तो प्रसिद्ध करून त्या आधारे सूचना व दुरुस्त्यांनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकृत करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष ज्या दिनी सुरू करण्यात आली, तोच हा 26 जानेवारी 1950 दिवस. हां, हां म्हणता, 74 वर्षे पूर्ण झाली. आपण भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्षात पदार्पणही केले. गेल्या दहा वर्षांत भारताच्या प्रगतीचा वेग प्रचंड वेगाने वाढत आहे. कालमान बदलानुसार भारतीयही बदलले. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या काही प्रथा, आपल्या चालीरिती, या भारतीयांनी चालू ठेवतच नव्याचाही स्वीकार केला. भारतीय आज जगात कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. याचे श्रेय भारतीय नागरिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांना जाते. देश प्रजासत्ताक झाला असला तरी प्रजेला अमर्याद अधिकार मिळत नसतात. देश, राज्य म्हणून आपली जी काही कर्तव्ये आहेत, ती आपल्याला पार पाडावीच लागणार आहेत. भारतीय घटना हा आपल्या तमाम भारतीय नागरिकांसाठी एक पवित्र ग्रंथ आहे. रामायण, महाभारत, गीता हे जसे आपले पवित्र ग्रंथ आहेत, तशाच पद्धतीने भारतीय घटना हा देखील भारतासाठी एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथात आपल्याला अनेक अधिकार जे प्राप्त आहेत, त्यांची जंत्री आहेच शिवाय आपलीही काही कर्तव्ये आहेत आणि ती प्रत्येक भारतीय नागरिकाला पार पाडायची आहेत. लोकशाहीमध्ये काही व्यवस्था आहेत. त्या व्यवस्थेतूनच आपल्याला जायचे आहे. केवळ आपल्याला आज अधिकारांची आठवण होतेय मात्र कर्तव्याची जाणीव होत नाही. भारताचे आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग. दि. माडगुळकर यांनी भारताच्या महान परंपरा आणि प्रतिभावान अशा या राष्ट्राचे वर्णन आपल्या ओजस्वी शब्दात शब्दबद्ध करताना म्हटलेले आहे की, ‘हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे’. याचाच अर्थ थोड्या पराभवाने या देशाला निराशा येत नाही कारण या देशाच्या भूमीवर भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे अर्जुनाला उपदेश केला. भगवतगीतेचे स्तन्य या देशाने प्यायलेले आहे. गीतेची तत्त्वे, गीतेचा अर्थ, त्याचा बोध आणि संस्कारातून देशवासियांचे पालन-पोषण झालेले आहे म्हणून आपण भारतीय पराभवाची कधी तमा बाळगीत नसतो व त्यामुळेच जोवर नभात चंद्र, सूर्य नांदत राहतील, तोवर हा देश अखंडित राहील आणि चिरंजीवी ठरणारा आहे, असे संबोधलेले आहे. आज जागतिक पातळीवर विचार करता कोविडमुळे अनेक देश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या धडाधड कोसळले. अवसान गळून बसले. या देशातही लाखोंच्या संख्येने कोविडमुळे प्राण गमावून बसले. तरी देखील आपला देश डगमगला नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने ‘पुनश्य हरि ओम’ करीत भारताने आज जागतिक पातळीवर विकास क्षेत्रात उंच भरारी मारलेली आहे. भारतीय तिरंगा हे आमचे अभिमानाचे प्रतिक आहे आणि ‘सत्यमेव जयते’ हे आपले ब्रीद आहे. तीन वाघांची तोंडे हे आपले मुख्य चिन्ह असून ते एक शौर्याचे प्रतिक आहे. भारतीय प्रजासत्ताकमध्ये प्रजेला फार महत्त्व आहे, मात्र सर्वाधिकार कोणालाही नाही. ना प्रजेला ना सरकारी अधिकाऱ्यांना, ना न्यायालयांना आणि ना राजकीय नेत्यांना. कोणताही निर्णय हा मंत्रीमंडळासमोर जाऊन मान्यता घ्यावी लागते व नंतरच त्याची एकमताने अंमलबजावणी होते किंवा संसदेत वा विधिमंडळात मान्यता मिळवून त्याची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावर वा राज्यस्तरावर होते. घटनेच्या चौकटीत बसूनच हे सर्व निर्णय घ्यावे लागत असल्याने भारतीय घटनेला असलेले महत्त्व हे अबाधित आहे. भारतीय घटनेशी आपण सर्वजण बांधिल आहोत. भारतीय घटना व त्याची कार्यवाही होऊन आज 75 वर्षे झाली. काळानुऊप त्यात आवश्यकवेळी अनेक दुऊस्त्या व काही बदलही करीत आलो आहोत. काश्मिरसाठी 370 वे कलम म्हणजे देशाला लागलेला कलंक होता. देशाच्या इतिहासात व भारतीय घटनेला जोडून करण्यात आलेला हा प्रयत्न आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यामुळेच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग झाला. काश्मिरच्या बदल्यात भारताने असंख्य माणसे गमविली. भारतात राहून वेगळ्या राष्ट्राचे विचार आणि प्रवाह हा प्रकार म्हणजे नको त्या ठिकाणी झालेली जखम होती. ती आता पूर्ण बरी झाली आणि काश्मिर भारताचाच भारतीय घटनेनुसार अविभाज्य भाग झाला. भारतीय प्रजासत्ताकाची 75 वर्षे! याच समयी भारताने जागतिक पातळीवर विकासदृष्ट्या चौथे स्थान प्राप्त केले. भारताचे हे पाऊल महासत्तेच्या दिशेने होत आहे. ‘रामायणे घडावी येथे पराक्रमाची’ याचा अनुभव याच आठवड्यात आपण घेतलेला आहे. भारत जागतिक एक महानराष्ट्र बनलेच, केवळ प्रजासत्तेच्या भक्कम पाठिंब्याने व प्रजासत्तेच्या भक्कम पायामुळे!