अमृत तलावांचा जनावरांना आधार
रोहयोंतर्गत निर्मिती : पाण्याचा सदुपयोग, समाधानकारक पावसामुळे सरोवर काठोकाठ
बेळगाव : पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत सरोवरांची (तलाव) निर्मिती करण्यात आली आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे हे सरोवर पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या तलावातील पाण्याचा शेती आणि जनावरांसाठी वापर होऊ लागला आहे. अमृत सरोवर शेती आणि जनावरांना आधार ठरू लागले आहेत. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात 75 अमृत सरोवर तलावांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी बेळगाव तालुक्यातील 23 तलावांचा समावेश आहे. बेळगाव तालुक्यात कडोली, अगसगे, वंटमुरी, बस्तवाड, बसरीकट्टी, बेकिनकेरे, हिंडलगा, चलवेनहट्टी आदी गावांमध्ये या तलावांची निर्मिती झाली आहे.
या तलावांमध्ये 10 लाख लिटर पाण्याचा साठा होऊ लागला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील शेती आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याबरोबर तलावांच्या सभोवती असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळीही वाढण्यास मदत झाली आहे. रोजगार हमी योजनेतून या तलावातील गाळ आणि स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे रोहयो कामगारांनाही कामे उपलब्ध झाली आहेत. विशेषत: अगसगा आणि चलवेनहट्टी येथील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आहे. त्याबरोबर स्थानिक गावातील रोहयो कामगारांनाही अधिक दिवस काम उपलब्ध झाले आहे. त्याबरोबर जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशु-पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शेळ्या-मेंढ्यानाही पाणी उपलब्ध
रानोमाळ चरण्यासाठी फिरणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांनाही अमृत सरोवर तलावातील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. तलाव हे बाहेरच असल्याने चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांबरोबर शेळ्या-मेंढ्यांचीही तहान भागत आहे.
नागरिकासह जनावरांनाही उपयोग
बेळगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी तलावातील गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत. यंदा झालेल्या अधिक पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्याचा आता नागरिकांबरोबर जनावरांनाही उपयोग होऊ लागला आहे.
- बी. डी. कडेमनी (ता. पं. साहाय्यक निर्देशक)