मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेला ब्रेक
मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आता पाऊस ओसरल्यानंतरच यात्रेकरूंचा प्रवास पुन्हा सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. अमरनाथ यात्रा 29 जून रोजी दोन मार्गांनी सुरू करण्यात आली होती. ही यात्रा 19 ऑगस्टला संपणार आहे.
बालटाल आणि पहलगाम मार्गावर शुक्रवारी रात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे भाविकांचे मार्गक्रमण नैसर्गिक आपत्तीच्या कात्रीत सापडल्याने प्रवास तात्पुरता रोखण्यात आला आहे. दरम्यान, 3,800 मीटर उंच गुंफा मंदिराला भेट देणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या लिंगाचे दर्शन’ घेणाऱ्या भाविकांची संख्या लाखांवर गेली आहे. गेल्यावषी 4.5 लाखांहून अधिक भाविकांनी गुहा मंदिरात प्रार्थना केली होती.
अमरनाथ यात्रेने यंदा नवे विक्रम केले आहेत. आतापर्यंत अवघ्या पाच दिवसांत एक लाखाहून अधिक लोक या यात्रेत सहभागी झाले आहेत. लोक मोठ्या उत्साहाने हा 52 दिवसांचा प्रवास करतात. ही यात्रा केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे सांगितले जाते.