जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाले तरी चरी बुजविण्याचे काम अपूर्ण
काँक्रिटीकरणचे काम रखडल्याने उचगाव ग्रामस्थांमधून संताप
वार्ताहर /उचगाव
उचगाव गावामध्ये जलजीवन या केंद्राच्या मुबलक आणि 24 तास पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करून जवळपास दीड वर्ष होत आले. यामध्ये गणपत गल्ली आणि लक्ष्मी गल्ली ही गावातील ये-जा करणारे महत्त्वाचे मार्ग असून या मार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा चरी मारून पाईपलाईन घालण्यात आली. चरी बुजविण्यात आल्या. मात्र वरती काँक्रिट अथवा पेव्हर्स बसविण्याचे काम अद्याप रखडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारच्या जलजीवन या योजनेअंतर्गत गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा चरी मारून यामधून पाईप घालून घरोघरी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या घरोघरी गावात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र राहिलेली उर्वरित कामे याकडे सदर ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळ्याला सुऊवात होत आहे. तरी गणपत गल्ली आणि लक्ष्मी गल्लीतील रस्त्याच्या दुतर्फा खणलेल्या चरी भरून एक वर्ष उलटले तरी या चरीवरती काँक्रिटीकरण अथवा पेव्हर्स बसवण्याचे काम अद्याप झालेले नाही. परिणामी या चरींवरती धूळ आणि सध्या वळीव पावसामुळे होणाऱ्या चिखलामुळे नागरिकांना सामना करण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाळा सुरू झाला तर या चरीच्या वरती टाकलेल्या मातीचा चिखल होऊन घरोघरी पसरणार आणि याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार आहे. तरी सदर ठेकेदाराने तातडीने या गल्लीमधील काँक्रिटीकरण अथवा पेव्हर्स बसवण्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा याचा जाब संबंधित खात्याला विचारला जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.