लोकसभेचे जागावाटप हेच ‘इंडिया’साठी मोठे आव्हान!
ममता बॅनर्जींसह अन्य नेत्यांकडून आतापासूनच दबावतंत्र
वृत्तसंस्था/ कोलकाता, नवी दिल्ली
देशात चार महिन्यांनी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये भाजपशी टक्कर देण्यासाठी 28 पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली. परंतु या आघाडीसमोरील सर्वात मोठा मुद्दा जागावाटपाचा आहे. काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेसाठी एक समिती स्थापन केली असतानाच आता काही बड्या पक्षांनी आपापल्या राज्यातील स्थिती पाहून दबावतंत्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेस बंगालमधील कोणत्याही पक्षासोबत कोणताही निवडणूक करार करणार नाही. इंडिया आघाडी संपूर्ण देशात भाजपच्या विरोधात एकत्र निवडणुका लढवेल, परंतु पश्चिम बंगालमध्ये टीएमसी भाजपविरोधात एकट्याने लढेल. आपला पक्ष राज्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी तडजोड करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. ममता बॅनर्जींच्या या पवित्र्यामुळे ‘इंडिया’ आघाडीमध्ये संघर्ष होण्याची शक्मयता आहे. दुसरीकडे शिवसेनेने (उद्धव गट) महाराष्ट्रात जागावाटपाबाबत पहिले पाऊल टाकले आहे. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पंजाब आणि दिल्लीतही अशीच समस्या भेडसावत असून आम आदमी पार्टी काँग्रेससोबत जागावाटपासाठी तयार नाही. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव विधानसभा निवडणुकीत सपासोबत केलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून बदला घेण्याच्या तयारीत असल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत जागावाटप चर्चेवरून बरीच ओढाताण होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
काँग्रेस-डावे मिलीभगतचा ममतांचा आरोप
राहुल गांधी नागपुरात काँग्रेसच्या सभेला संबोधित करत असताना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील चकला येथे सभा घेतली. या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी राज्यात आपला पक्ष काँग्रेस किंवा डाव्या पक्षांशी तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि माकपवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोपही केला. ‘इंडिया’ आघाडीत सामील झाल्यानंतरही काँग्रेस आणि सीपीआय(एम)चे नेते बंगालमध्ये टीएमसीच्या विरोधात प्रचार करत असल्याचे सांगितले. तसेच ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात भाजपवर नागरिकत्व दुऊस्ती कायद्यावर राजकारण केल्याचा आरोप केला. जर एखाद्या समुदायाला सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळत असेल तर इतर समुदायांनाही ते हक्क मिळायला हवेत, असेही सांगितले.
उद्धव ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा
अलीकडेच दिल्लीत झालेल्या इंडिया अलायन्सच्या चौथ्या बैठकीत नितीश कुमार यांच्या ‘इंडिया’विषयीच्या वक्तव्यावर आणि इंग्रजीबद्दलची नाराजी यावर बरीच चर्चा झाली. चौथ्या बैठकीनंतरही सर्व पक्षांमधील जागावाटपाची चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळेच आता काँग्रेसेतर विरोधी पक्षांची मनस्थिती ओळखून ‘एकला चलो रे’चा मार्ग अवलंबलेला दिसतो. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागांवर उघडपणे दावा केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. येथे काँग्रेस, शिवसेना (युबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात जागा निश्चित करून घेताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.