महानगरपालिकेचे कायदा सल्लागार धारेवर
जय किसान भाजी मार्केटने मिळविलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करा : एपीएमसी व्यावसायिकांची मागणी : मनपात उडाला गोंधळ
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गाशेजारी उभे करण्यात आलेले जय किसान भाजी मार्केट हे बेकायदेशीर असल्याची तक्रार एपीएमसी येथील व्यापाऱ्यांनी केली होती. या प्रकरणी महानगरपालिकेने संबंधित भाजी मार्केटला नोटीस दिली होती. त्याविरोधात जय किसानने उच्च न्यायालयात स्थगिती मिळविली. ती स्थगिती उठवण्यासाठी एपीएमसी मार्केटमधील व्यावसायिकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, महानगरपालिकेच्या कायदा सल्लागारांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत गुरुवारी एपीएमसी मार्केटमधील व्यावसायिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
तुम्ही बेकायदेशीर कामे करत असलेल्यांना पाठीशी घालत आहात, असा आरोप त्यांनी केला. जय किसान भाजी मार्केटच्या खटल्याची सुनावणी शुक्रवार दि. 13 रोजी आहे. त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपले म्हणणे मांडून ती स्थगिती उठवू, असे आश्वासन कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी यांनी एपीएमसीच्या व्यावसायिकांना दिले होते. मात्र, मंगळवार दि. 17 रोजी न्यायालयात म्हणणे मांडू, असे अॅड. उमेश महांतशेट्टी हे सांगत होते. यावेळी या व्यावसायिकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्ही कशासाठी आहात? महानगरपालिका तोट्यात आहे. जाणूनबुजून तुम्ही लोकांना त्रास देत आहात, असा आरोप केला.
एपीएमसीमधील भाजी मार्केटचे व्यावसायिक यावेळी चांगलेच संतापले होते. त्यांनी अक्षरश: या अधिकाऱ्यांना जेरीस आणले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये तुम्ही ठोस आश्वासन दिले होते, की कोणत्याही परिस्थितीत ती स्थगिती उठवू, असे सांगितले. मात्र, आता का तुम्ही माघार घेता? असा संतप्त सवाल या व्यावसायिकांनी केला. व्यावसायिकांच्या रुद्रावतारामुळे महानगरपालिकेतील कायदा विभागामधील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
आतापर्यंत चारवेळा तारखा पुढे ढकलल्या आहेत. जाणूनबुजून तुम्ही जय किसान भाजी मार्केटच्या व्यावसायिकांना अप्रत्यक्ष सहकार्य करीत आहात, असा आरोप या व्यावसायिकांनी केला. 2023 मध्ये आम्ही तक्रार दिली. त्यावेळी बेकायदेशीर आहे हे मान्य करून नोटीस बजावली. त्याविरोधात त्यांनी स्थगिती घेतली. ती स्थगिती तुम्हाला उठवता येत नाही. आम्ही स्वतंत्र वकील देखील दिला आहे. त्याची फी स्वत: देत आहोत. असे असताना तुम्ही सहकार्य करत नाही, असे म्हणत धारेवर धरण्यात आले. यावेळी कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी यांची पाचावर धारण बसली होती. एपीएमसीमधील व्यावसायिक संतप्त झाले होते. या संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी तर तुम्हाला होत नसेल तर आम्हाला तसे लिहून द्या, असा आग्रह धरला होता. जोरदार आवाज सुरू असल्यामुळे इतर अधिकारी मात्र चांगलेच तणावाखाली आले होते.
17 सप्टेंबरला म्हणणे मांडू
आपली तयारी झाली नाही. त्यामुळे 17 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीत आम्ही म्हणणे मांडू, अशी विनवणी कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी हे करत होते. यावेळी नियोजन अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकांचा पारा पाहता त्यांनाही शांत घ्यावे लागले. एकूणच व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या कायदा सल्लागारांबाबत संताप व्यक्त केला होता.
पैशासाठी तुम्ही वाटेल ते करता
महानगरपालिकेतील कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. तुम्ही बेकायदेशीर कामांमध्येच गुंतला आहात. एकही काम कायदेशीर पद्धतीने करत नाही, असा आरोप करत होते.
सावळा गोंधळ चव्हाट्यावर
यावेळी अधिकाऱ्यांनी आम्ही सर्व कायद्याच्या चौकटीत करत आहोत, असे सांगत असताना हो, तुम्ही आजपर्यंत कायद्याच्या चौकटीतच केला आहात, हे संपूर्ण शहराला माहीत झाले आहे, असा टोला देखील या व्यावसायिकांनी लगावला. एकूणच महानगरपालिकेतील चाललेला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
पूर्ण इमारतच बेकायदेशीर
महानगरपालिकेने जय किसान भाजी मार्केटला परवानगी दिली आहे, तीच मुळात बेकायदेशीर आहे. केवळ बचाव करण्यासाठी आता नोटीस देण्यात आली आहे. मात्र, या नोटिसीलाही टक्कर देता येत नाही, हे दुर्दैव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी बेकायदेशीर असल्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतर मनपाने न्यायालयात आपले म्हणणेच मांडले नाही, असा आरोप देखील व्यावसायिकांनी केला आहे. इमारत परवानगी न घेताच बांधण्यात आली आहे. त्यानंतर त्या इमारतीला बेकायदेशीररित्या सीसी (पूर्णत्वाचा दाखला) दिला गेला आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.