ईश्वराच्या मर्जीनुसार सर्व सृष्टी चालते
अध्याय पहिला
बाप्पा म्हणाले, इंद्रियसुखांच्यामागे जो लागतो त्याचे दोन प्रकारे नुकसान होते. एक म्हणजे त्याचा परमप्राप्तीचा निश्चय मागे पडतो आणि दुसरे म्हणजे भोगांच्यामागे लागून तो बुद्धीचा दुरुपयोग करतो. जी मंडळी इंद्रियसुखांच्यामागे लागलेली असतात ती परमार्थदृष्ट्या झोपलेलीच असतात. त्याउलट योगी मात्र अशा ठिकाणी जागा असतो. इंद्रियसुखाची इच्छा झाली तर मनाला वेळीच सावध करतो. सामान्य मंडळी भोगविलासांच्या साधनांच्याबाबतीत जागृत असतात. संयमी मात्र ही साधने त्याचे ध्येय गाठण्यासाठी काहीच उपयोगी नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे अशावेळी निद्रिस्त असतो. ज्याप्रमाणे उन्हाळा असो वा दुष्काळ, समुद्रात कोणत्याही परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. त्याप्रमाणे संयमी योग्याचे वर्तन असते. तो कायम स्थिर असतो.
इहलोकी मनुष्याने आपापल्या आवडीच्या ठिकाणी वेगाने गमन करणाऱ्या इंद्रियांचा सर्व प्रकारे रोध करून रहावे म्हणजे त्याची बुद्धि स्थिर होते. अशा अर्थाचा अतस्तानीह संरुध्य सर्वत खानि मानव? । स्वस्वार्थेभ्य प्रधावन्ति बुद्धिरस्य स्थिरा तदा ।। 67।। श्लोक आपण पहात आहोत.
बाप्पा म्हणाले, इंद्रियांना अशाप्रकारे आवरून धरणे सोपे नाही कारण विषयांकडे ओढ घेणे हा माणसाचा उपजत स्वभाव असतो म्हणून त्यातले धोके, खाचखळगे लक्षात घेऊन त्यापासून लांब राहण्यातच हित आहे हे माणसाने लक्षात घ्यावे. विषयांकडे इंद्रिये धावू लागली की, त्यांना उत्तेजन न देता, समजुतीने वेसण घालण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न करायची सवय एकदा लागली की, हळूहळू स्वभावात बदल होऊन विषयांचं प्रलोभन वाटेनासं होतं. असं झालं की, इंद्रियांना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागत नाहीत. स्वभावात बदल झालेला असल्याने इंद्रियांना विषयांपासून रोखून धरणे आपोआपच घडत राहते परिणामी बुद्धी स्थिर होते.
इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंद्रिये विषयांकडे धाव घेतात इंद्रियांचा हा स्वभाव बदलण्यासाठी काय करायचं ते बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत
ममताहंकृती त्यक्त्वा सर्वान्कामांश्च यस्त्यजेत् ।
नित्यं ज्ञानरतो भूत्वा ज्ञानान्मुक्तिं स यास्यति ।। 68 ।।
अर्थ- ममत्व म्हणजे हे माझे ते माझे अशी बुद्धि आणि अहंकार म्हणजे मी अमुक करीन, तमुक करीन असा अभिमान टाकून जो सर्व इच्छांचा त्याग करतो तो सतत ज्ञानाच्या ठिकाणी रत होऊन ज्ञानाच्या योगाने मुक्तीप्रत जातो.
विवरण-आधीच्या श्लोकात बाप्पानी सांगितलं की, इंद्रियांची विषयांची ओढ कमी व्हावी म्हणून मनाला समजावून सांगावं की, असं करणं हितावह नाही. तरीपण काही वेळा मोह अनावर होतो म्हणून बाप्पा या श्लोकात सांगतायत की, माणसाला ममत्व आणि अहंकार या दोन दुर्गुणामुळे विषयांची ओढ लागते. ममत्व म्हणजे अमुक एक माझं आहे आणि ते मला पाहिजे असं वाटणं आणि अहंकार म्हणजे आपणच काय ते कर्तृत्ववान असा समज होऊन इतरांना तुच्छ लेखणं.
खरं बघायला गेलं तर इशावास्यउपनिषदात सांगितल्याप्रमाणे इथली प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या मालकीची आहे आणि काही काळ त्यानं ती आपल्याला वापरायला दिलीये. जी गोष्ट आपली नाही त्यात हे माझं आणि तेही माझंच असं म्हणता येणार नाही. हे जे लोक लक्षात घेतील ते आपोआपच सगळ्यावर मालकी दाखवणं बंद करतील आणि वस्तुविषयक ममत्व आपोआपच संपुष्टात येईल. तसंच हे मी केलं, मी त्याठिकाणी होतो म्हणून झालं इतर कुणाला जमलं नसतं असा विचार करणं म्हणजे आपण स्वत: कर्ता आहोत अशी ठाम समजूत असणं. प्रत्यक्षात ईश्वर स्वत: कर्ता असून त्याच्या मर्जीनुसार सर्व सृष्टी तो चालवत असतो.
क्रमश: