Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला दान का महत्वाचे? वाचा, पूजेचा मुहूर्त व महत्व
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले दानधर्म आणि पूजापठणामुळे कित्येक लाभ मिळतात
कोल्हापूर : हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेस अतिशय महत्त्व आहे. अतिशय शुभ आणि पुण्यदायी मानला जाणारा हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले दानधर्म आणि पूजापठणामुळे कित्येक लाभ मिळतात. विशेषत: लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 एप्रिलला संध्याकाळी 5.31 वाजता सुरू होणार असून 30 एप्रिलला दुपारी 2.12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिलला साजरी करण्यात येईल.
सोने खरेदीला महत्व
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने यादिवशी शुभकार्य केली जातात. तसेच नवीन वस्तू देखील घेतात. अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच यादिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात. गृहप्रवेश केला जातो, वास्तुशांती देखील घातली जाते. नवीन गाडी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अनेकजण घेतात.
दानाचे महत्व
भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. ज्याच्याजवळ आहे त्यांनी ज्याच्याजवळ नाही त्याला देऊन मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. ‘दान’ म्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशन देताना देणाऱ्याचे नाव, काय डोनेट केले आहे ते जाहीर केले जाते. एव्हढेच नव्हे तर तसा फलकही लावला जातो. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले या दोन्ही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, असे म्हटले जाते.
दान दिल्याने पुढच्या नव्हे याच जन्मात समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते. दानासारखे या पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही. लोभासारखा दुसरा शत्रू नाही. चारित्र्यासारखा दुसरा उत्कृष्ट अलंकार नाही आणि समाधानासारखे दुसरे धन नाही. या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आपण चांगल्या सवयींचा, चांगल्या कार्याचा प्रारंभ करू या. सण-उत्सवांचा मूळ उद्देश शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले ठेवणे हा आहे. या अक्षय्य तृतीयेपासून समाजातील गरीब-गरजू लोकांना मदत करण्याची आपण संवय लावून घेऊ तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्याचाही आपण प्रयत्न करु.
पौराणिक कथा
धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण यादिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते.