अखिलेश यादव सोडणार विधानसभेची जागा
आता करणार दिल्लीचे राजकारण : खासदारांच्या बैठकीनंतर घोषणा
वृत्तसंस्था/ लखनौ
कन्नौजमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या भेटीनंतर शनिवारी लखनौमध्ये त्यांनी ही घोषणा केली. साहजिकच आता अखिलेश दिल्लीचे राजकारण करणार आहेत. मैनपुरी जिल्ह्यातील करहाल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार एस. पी. सिंह बघेल यांचा 66 हजार मतांनी पराभव करून अखिलेश यादव आमदार झाले होते. त्यांनी ही जागा सोडल्यानंतर पोटनिवडणूक लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीतही समाजवादी पार्टीने चांगली कामगिरी नोंदवली आहे. 2022 मध्ये अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर आता 2024 मध्ये कनौज मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरत भाजप उमेदवार सुब्रत पाठक यांचा 1 लाख 70 हजार 922 मतांनी पराभव केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भारत आघाडीच्या विजयानंतर सपा आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज्यात आघाडीने एनडीएचा पराभव केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशमधून भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही विधानसभा निवडणूकही एकत्र लढू, असे त्यानंतर अजय राय यांनी जाहीर केले. तसेच रायबरेली मतदारसंघातून आपले प्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी राहुल गांधींना आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.