For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किश्तवाडनंतर आता कथुआत ढगफुटी

06:14 AM Aug 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
किश्तवाडनंतर आता कथुआत ढगफुटी
Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये 7 जणांचा मृत्यू : ढिगाऱ्याखाली गेली घरे

Advertisement

वृत्तसंस्था/ कथुआ

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातही अतिवृष्टीदरम्यान ढगफुटीची घटना घडली आहे. खोऱ्यात ढगफुटीमुळे अनेक घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तसेच जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाचेही नुकसान झाले आहे. तर मदत अन् बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली असून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 5 अल्पवयीनांचा समावेश आहे.

Advertisement

शनिवार आणि रविवारदरम्यान रात्री कथुआ जिल्ह्यातील राजबाग भागाच्या जॉड घाटी गावात ढगफुटी झाली, यामुळे गावाचा उर्वरित भागाशी असलेला संपर्क तुटला आणि मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. रस्तेसंपर्क तुटल्याने काही लोकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचविण्यात आले असल्याचे जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी सांगितले आहे.

आपत्तीची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफ पथकाला त्वरित गावात पाठविण्यात आले. स्थितीवर नजर ठेवली जात असून लोकांना मदत केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कथुआ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बगार्ड आणि चंगडा गावे तसच लखनपूर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या दिलवान-हुटली क्षेत्रात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. परंतु तेथे मोठ्या हानीचे वृत्त समोर आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

कथुआच्या अनेक हिस्स्यांमध्ये भूस्खलन झाले असून यामुळे जीवित तसेच वित्तीय हानी झाली आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत असे म्हणत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोकाकुल परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला त्वरित मदत, बचावकार्य राबविण्याचा निर्देश दिला आहे. तर अतिवृष्टीमुळे कथुआ येथील बहुतांश जलस्रोतांची पातळी वाढली आहे, तर उझ नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी जलस्रोतांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथुआतील ढगफुटीच्या घटनेसंबंधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत अन् बचावकार्य जारी आहे आणि एनडीआरएफची पथकेही घटनास्थळी पोहोचली आहेत. मोदी सरकारकडून शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आम्ही जम्मू-काश्मीरच्या बंधू आणि भगिनींसोबत मजबुतीने उभे आहोत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.