अफगाणिस्तान-पाकिस्तान चर्चा विफल
सूत्रांच्या महितीनुसार तुर्कियेची मध्यस्थी निरुपयोगी
वृत्तसंस्था / इस्तंबूल
तुर्कियेमधील इस्तंबूल येथे होत असलेली अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील शांतीचर्चा विफल ठरली आहे. दोन्ही देशांना एकमेकांचे मुद्दे आणि एकमेकांच्या अटी मान्य न झाल्याने ही चर्चा फसली, अशी माहिती देण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्रग संघर्ष झाला होता. त्यात पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले होते. तसेच अफगाणिस्तानचे नागरीकही पाकिस्तानच्या वायुहल्ल्यांमध्ये मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शांती चर्चा तुर्किये या देशाच्या मध्यस्थीने आयोजित करण्यात आली होती.
या चर्चेत अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, पाकिस्तानने अशक्य अशा अटी ठेवल्याने चर्चा फिस्कटली, असा आरोप तालिबानने केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानकडे लेखी शाश्वती आणि सुरक्षा यंत्रणा यांची मागणी केली होती. ती अफगाणिस्तानकडून फेटाळण्यात आली. पाकिस्तानने अमेरिकेचे ड्रोन्स अफगाणिस्तानविरोधात उपयोगात आणू नयेत, अशी मागणी तालिबान प्रशासनाने केली होती. मात्र, पाकिस्तानने ती अमान्य केली. अशा प्रकारे ही चर्चा अपयशी ठरली, अशी माहिती देण्यात आली.
पुन्हा संघर्ष भडकणार
इस्तंबूल येथील चर्चा विफल ठरल्यास अफगाणिस्तानविरोधात पाकिस्तान सरळ युद्ध करणार आहे, अशी धमकी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका मंत्र्याने दिली होती. आता ही चर्चा फिस्कटल्याने पाकिस्तान काय करणार आणि अफगाणिस्तान त्याला कसे प्रत्युत्तर देणार, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. दोन्ही देशांमध्ये कोणताही शांतता करार न झाल्याने पाकिस्तान अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे आपले काम पुढे चालू ठेवणार आहे, असे पाकिस्तानने स्पष्ट केल्याने संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.
तहरीक ए तालिबान पाकिस्तानचा मुद्दा
या चर्चेत तहरीक ए तालिबान पाकिस्तानचा मुद्दा महत्वाचा ठरला होता. या संघटनेला अफगाणिस्तानकडून होणारे साहाय्य बंद करावे, अशी पाकिस्तानची मागणी होती. तथापि, ही संघटना पाकिस्तानातील असून तो पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे. या प्रश्नाशी अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाचा कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन अफगाणिस्तानच्या प्रतिनिधींनी केले. त्यामुळे या मुद्द्यावरही चर्चा अनिर्णित राहिली आहे. या चर्चेत तुर्किये आणि कतार या देशांच्या अधिकाऱ्यांनीही भाग घेतला होता. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही देशांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, तोही असफल ठरला. ही चर्चा तीन दिवस चालली. तथापि, एकाही मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही.