For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमरगा विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची मागणी

04:05 PM Dec 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
उमरगा विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची मागणी
Advertisement

शिवसेना पक्षाकडून केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे मागणी

उमरगा प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी (दि.१३) रोजी लोहारा तालुक्याचा दौरा केला. शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे व शिष्टमंडळाने या पथकाची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने विविध उपयोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement

यंदाच्या पावसाळ्यात उमरगा विधानसभा मतदारसंघातील उमरगा लोहारा तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी शासन विविध दीर्घकालीन उपयोजना करतच आहे परंतु सध्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करणेबाबत विमा कंपनीस आदेश व्हावेत. गावोगावी आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवत असुन पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत २ प्रकल्प वगळता जवळपास सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत. उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई या संकटांचा सामना करावा लागणार आहे. या अनुषंगाने विविध उपयोजना आखणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी आवश्यकतेनुसार केले जाणारे अधिग्रहणाची प्रशासकीय मंजुरी तातडीने होणेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र भूवैज्ञानिक नेमून प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया १ खिडकी पद्धतीने राबविणे गरजेचे आहे. भविष्यात होणारी चारा टंचाई लक्षात घेऊन शासनाने अनेक प्रकल्पात संपादित केलेल्या जमिनीत वैरण विकास कार्यक्रम राबविल्यास चारा उपलब्ध होऊ शकतो. दुष्काळी परिस्थितीमुळे रोहयो मधून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्वरूपातील कामे हाती घेण्यात यावी, मातोश्री शेतपानंद रस्ते योजनेतील जाचक अटी शिथिल कराव्यात, गाळ्मुक्त तलाव - गाळयुक्त शिवार अभियान पुन्हा हाती घेण्यात यावे, वन्य प्राण्यांसाठी जागोजागो पाणवठे तयार करणे, पिक विमा कंपनीच्या जाचक अटी शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडून ठोस पावले उचलावीत, असलेला पाणीसाठा वाचविण्यासाठी नळ दुरुस्ती करणे, तलावात जास्तीत जास्त बुडक्या घेणे, गावागावातील विहिरींमधून गाळ काढणे, आदी उपयोजना राबविल्यास नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असे निवेदनात म्हणले आहे.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर सूर्यवंशी, प्रताप लोभे, अनिल बायस, परवेज तांबोळी, गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अमीन सुंबेकर, आयुब शेख, सरपंच शेखर घंटे, हणमंत गुरव, भगत माळी आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.