जांबोटी-कणकुंबी भागात भातरोप लागवडीला वेग
संततधार पावसामुळे भातरोप लागवडीला अनुकूल वातावरण
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या आठ दिवसांपासून संततधार अतिवृष्टी सुरूच असून, शेतवडीत सर्वत्र मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागात भातरोप लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भातरोप लागवडीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्ग खरीप हंगामात भात पेरणीऐवजी भातरोप लागवड मोठ्या प्रमाणात करतात. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भात रोप लागवडीसाठी आवश्यक तरुची पेरणी करण्यात येते. भात रोपांची उगवण झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांच्या कालावधीनंतर भात रोपांची शेतवडीत लागवड करण्यात येते.
यासाठी संततधार पाऊस तसेच शेतवडीत मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याची आवश्यकता असते. पूर्वी बैलजोडी व औताच्या सहाय्याने शेतवडीमध्ये पारंपरिक पद्धतीने पाण्यातील मशागतीची कामे करून रोप लागवड करण्यात येत होती. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षापासून शेतकरी पॉवर टिल्लर, रोट्ररीसारख्या आधुनिक यांत्रिक अवजारांचा वापर करून रोप लागवडीसाठी आवश्यक मशागतीची कामे करण्यात येत असल्यामुळे आता भातरोप लागवडीची कामे सोपी झाली आहेत. मात्र यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. रोप लागवडीसाठी महिला मजुरांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे मजुरीचे दरदेखील गगनाला भिडले आहेत.