‘जिंकण्याची क्षमता’ हाच भाजप उमेदवारीचा निकष
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत
पणजी : निवडणूक लढण्यात कुणाला स्वारस्य आहे किंवा कुणी अनिच्छा दर्शविलेली आहे याच्यापेक्षा कोणत्या उमेदवारात जिंकण्याची क्षमता आहे तो निकष जास्त महत्त्वाचा आहे, आणि त्याच निकषावर संभाव्य उमेदवाराची निवड करण्यात येईल, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या प्रदेश समितीने आमदार दिगंबर कामत, सभापती रमेश तवडकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार दामोदर नाईक, या पाच संभाव्य उमेदवारांची नावे पक्षाच्या संसदीय मंडळाकडे विचारार्थ सादर केली आहेत. मात्र त्यापैकी कामत आणि तवडकर यांनी अनिच्छा दर्शविली आहे. भाजपमध्ये कोणाला स्वारस्य आहे किंवा कोणाला नाही. येथे आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले तरी शेवटी देशहिताचा विचार करूनच हायकमांड योग्य उमेदवाराची निवड करेल हे महत्त्वाचे आहे. तरीही पक्ष शेवटी जिंकण्याच्या क्षमतेच्या निकषावरच निर्णय घेईल हे मान्य केले पाहिजे. तोच निकष दक्षिण गोव्यातील उमेदवार निवडतानाही लावण्यात येणार आहे. यंदा आम्ही दक्षिण गोव्याची जागा जिंकणार याबद्दल ठाम खात्री आहे, असे ते म्हणाले. उत्तर गोव्यातील उमेदवार मात्र जवळजवळ निश्चित झालेला आहे. त्यांच्या नावाची पक्षाकडून केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. उत्तर गोव्यातील लोकांनी तब्बल पाच वेळा भाजपला कौल दिला आहे. 2024च्या निवडणुकीतही तीच परंपरा कायम राहील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.